ठोसेघर -करोनाच्या प्रादुर्भावामुळे निधी उपलब्धतेसाठी अडचणी येत होत्या. मात्र, ही अडचण आता दूर झाली असून परळी ते केळवली, आलवडी, रोहोट या उरमोडी रिंग रोडसाठी सुमारे अडीच कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. या कामाला ऑक्टोंबरनंतर सुरवात करण्यात येईल, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
कुस बुद्रुक येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले, कूसच्या सरपंच शोभा लोटेकर, उद्योजक संतोष लोटेकर, बबन लोटेकर, सूर्यकांत लोटेकर आदी मान्यवर उपस्थित होते. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात जाऊन राजकीय पोळी भाजणारे आपल्या परळी खोऱ्याचा काय विकास करणार आहेत? आम्ही अगोदर कामे पूर्ण करतो आणि नंतर सांगतो.
करोनामुळे निधीच उपलब्ध होत नसल्याने काही कामे अपूर्ण राहिली. सध्या परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. निधीदेखील येण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांतच सर्व विकास कामे पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी माझी आहे. दळणवळणासाठी असलेल्या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण तसेच डांबरीकरण करण्यासाठी ऑक्टोबरपासून सुरुवात करण्यात येईल.’
भाऊसाहेब महाराजांपासून परळी खोऱ्याचे आमच्या घराण्यावर प्रेम आणि साथ कायम राहिली. या भागात आता काही जणांना स्वार्थासाठी राजकीय पदे पाहिजेत म्हणून इकडे तिकडे उड्या मारत आहेत. चिखली, जांबे, ठोसेघर तसेच परळी, केळवली, नित्रळ, धावली, नावली, सावली, पाटेघर यांसारख्या दुर्गम भागातही शासनाच्या सर्व योजना पोहोचवल्या आहेत. शासनाच्या कोणत्याही योजनेपासून ही गावे वंचित राहिलेली नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
भागातील कोणतीही कामे असू द्या, सांगाल ती कामे मार्गी लावू, भागाच्या विकासासाठी आमदार म्हणून मी होतो आणि कायम राहणार, असे सांगत शिवेंद्रसिंहराजे यांनी विरोधकांवर तोफ डागली. भागाची साथ कायम शिवेंद्रराजेंच्यासोबत राहू द्या, भागाचा विकास करण्याची जबाबदारी आम्ही घेतो, असे राजू भोसले यांनी सांगितले. इकडून तिकडून उड्या मारणाऱ्यांचा समाचार नक्कीच घेतला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
इकडे तिकडे जाणाऱ्यांची पात्रता तपासण्याची गरज
स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी तसेच पदे उपभोगण्यासाठी काही संधीसाधूंनी वेगळा निर्णय घेऊन पक्षांतर केले. त्यांची पात्रता तपासण्याची गरज आहे. माझी बिले निघाली नाहीत. टेंडर मिळालं नाही असा विरोध असेल तर तो परळी भागासाठी काय उपयोगी पडणार आहे, अशी टीका शिवेंद्रसिंहराजे यांनी केली.