Top 10 News : रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांचा अपघात? दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून नवा वाद निर्माण झालाय. अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार यांनी घातपाताचा संशय व्यक्त करत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. अशातच आता भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी वेगळाच दावा केलाय. रोहित पवार यांच्याशी संबंधित शेटफळगडे येथील साखर कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळे परिसरात कृत्रिम धुके निर्माण झाले आणि त्यामुळे विमान अपघाताची शक्यता निर्माण झाली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी सोलनकर यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीय. दरम्यान, रोहित पवार यांनी हे सर्व आरोप फेटाळत हे विधान राजकीय द्वेषातून केल्याचा आरोप केलाय. तसेच मोठे नेते स्वतः बोलू शकत नसल्याने इतरांकडून आरोप करून घेतले जात असल्याचा पलटवार त्यांनी केला. २) राष्ट्र्वादीतील अनेक नेत्यांचा पक्षाला रामराम सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीमध्ये राजीनामा सत्र सुरू झालंय. महानगरपालिका कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गौतम खरात यांनी पदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिलाय. खरात यांनी पक्षात अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची नाराजी व्यक्त केलीय. तसेच पक्षात केवळ काही ठराविक नेते आणि त्यांच्या नातेवाईकांनाच महत्त्व दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. याआधी मोटर मालक वाहतूक सेलचे सचिन जाधव, उद्योग विभागाचे सुभाष मालवणी आणि असंघटित कामगार विभागाचे मनोज व्यवहारे यांनीही पदांचे राजीनामे दिले आहेत. दरम्यान, 26 जानेवारीपासून सुरू झालेल्या या नाराजीच्या पार्श्वभूमीवर काही पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे अजित पवार यांच्याकडे दिले होते. त्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आलेत. ३) “मी सोबत असेपर्यंत मोदीच पंतप्रधान” राज्यसभेवर पुन्हा निवड झाल्यानंतर रामदास आठवले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. धुळे येथील महाराणा प्रताप चौकातील सभेत बोलताना आठवले म्हणाले की, मी ज्या पक्षासोबत असतो तो पक्ष सत्तेत येतो, असा आजवरचा अनुभव आहे. “मी जोपर्यंत सोबत आहे, तोपर्यंत नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान राहतील,” असं विधान त्यांनी केलयं. तसेच भाजपला आमच्या पक्षाची मदत होत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केलं. एवढंच नाही तर RPI पक्ष लवकरच राष्ट्रीय पक्ष होईल, असा दावा देखील त्यांनी केलाय. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली राज्यघटना कोणीही बदलू शकत नाही, असं सांगत विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत खोटा प्रचार केल्याचा आरोपही आठवले यांनी केला. ४) जुनी वाहने स्क्रॅप केल्यास करात मोठी सवलत राज्य सरकारने जुनी व जास्त प्रदूषण करणारी वाहने कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेतलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात जुनी वाहने स्क्रॅप केल्यास मोटार वाहन करात मोठी सवलत देण्याची घोषणा केलीय. जर एखाद्या वाहनधारकाने BS-IV किंवा त्यापेक्षा जुने वाहन स्क्रॅप करून नवीन वाहन खरेदी केले तर त्यांना मोटार वाहन करात १६ टक्के सवलत मिळेल. तसेच BS-III किंवा त्यापेक्षा जुने वाहन स्क्रॅप केल्यास नवीन वाहन खरेदीवर ३० टक्के कर सवलत मिळणार. सरकारी वाहने १५ वर्षांनंतर स्क्रॅप करणे बंधनकारक असेल, तर खाजगी कारसाठी २० वर्षांनंतर स्क्रॅपचा पर्याय दिला जाणारय. दरम्यान, १५ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांवरील ग्रीन टॅक्स दुप्पट करण्याचा प्रस्तावही सरकारने मांडला असून प्रदूषण नियंत्रणासाठी ही पावले उचलली जात आहेत. ५) बिहारच्या राजकारणात नवी एंट्री- बिहारच्या राजकारणात मोठी घडामोड घडलीय. मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांनी अधिकृतपणे जनता दलमध्ये प्रवेश केलाय. पटना येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारत सक्रिय राजकारणात पाऊल टाकलेय. नितीश कुमार राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ते लवकरच मुख्यमंत्रीपद सोडू शकतात. या पार्श्वभूमीवर निशांत कुमार यांना सरकारमध्ये मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. काही वृत्तांनुसार, भाजप-जेडीयू आघाडी सरकारमध्ये त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळू शकते. दरम्यान, निशांत कुमार यांनी “वडिलांनी गेल्या २० वर्षांत केलेले काम जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन,” असं सांगत पक्ष संघटना मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केलाय. ६) “मला सर्वात जास्त हर्ट होतं…” दक्षिणात्य सुपरस्टार थलापति विजय सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. पत्नी संगीता यांनी घटस्फोटासाठी न्यायालयात याचिका दाखल केली असून या प्रकरणावर विजय यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीय. विजय यांच्यावर अभिनेत्री तृषा कृष्णनसोबत सोबत कथित अफेअर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर चाहत्यांसमोर बोलताना विजय म्हणाले, “माझ्याभोवती सुरू असलेल्या समस्यांबद्दल तुम्ही चिंता करू नका. त्या गोष्टी मी स्वतः हाताळेन. मात्र माझ्यामुळे चाहते दु:खी किंवा तणावात दिसतात, हीच गोष्ट मला सर्वात जास्त हर्ट करतेय.” दरम्यान, विजय आणि त्यांच्या पत्नी संगीता गेल्या दोन वर्षांपासून वेगळे राहत असल्याची माहितीही समोर आलीय. ७) “खामेनींच्या हत्येचा बदला घेतल्याशिवाय मागे हटणार नाही” मध्यपूर्वेत तणाव प्रचंड वाढला असून डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका आणि इस्रायल यांनी 28 फेब्रुवारी 2026 रोजी केलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर परिस्थिती अधिक चिघळलीय. या हल्ल्यात अली खामेनी यांचा मृत्यू झाला असून इराणने बदला घेण्याची भूमिका घेतलीय. इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानी यांनी कठोर इशारा देत म्हटले की, “आमच्या नेत्याच्या रक्ताचा बदला घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.” ट्रम्प यांना लक्ष्य करत इराणची प्रतिक्रिया अजून बाकी असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या संघर्षात शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून मध्यपूर्वेत युद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या संघर्षाकडे लागलेय. ८) रॅपर बालेंद्र शाहकडून माजी पंतप्रधान के. पी. ओलींचा पराभव नेपाळमधील सार्वत्रिक निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ झालीय. ३५ वर्षीय रॅपर आणि राजकारणी बालेंद्र शाह यांनी माजी पंतप्रधान के.पी. ओली यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केलाय. झापा-५ मतदारसंघातून शाह यांनी सुमारे ५० हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार शाह यांना ६८,३४८ मते, तर ओली यांना १८,७३४ मते मिळाली. या निकालामुळे नेपाळच्या पारंपरिक राजकीय पक्षांना मोठा धक्का बसलाय. दरम्यान, आरएसपीनेही या निवडणुकीत मोठे यश मिळवलंय. १२९ पैकी १०० जागांवर पक्षाने विजय मिळवत काठमांडूमधील सर्व जागांवर क्लीन स्वीप केलाय. या निकालानंतर बालेंद्र शाह नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान बनण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. ९) आलिया भट्टकडून ‘धुरंधर २’ ट्रेलरचे कौतुक दिग्दर्शक आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या धुरंधर 2 या चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज झालाय. अॅक्शन, बदला आणि देशभक्तीच्या भावनेने भरलेला हा ट्रेलर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतोय. ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली असून काही तासांतच युट्यूबवर त्याला लाखो व्ह्यूज मिळालेत. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिनेही या ट्रेलरचे कौतुक केलंय. आलियाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ट्रेलर शेअर करत “Beast mode on… हा ट्रेलर पूर्णपणे आउट ऑफ कंट्रोल आहे,” अशी प्रतिक्रिया दिलीय. ‘धुरंधर २’च्या ट्रेलरमधील अॅक्शन आणि दमदार सादरीकरणामुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढलीय. आता चित्रपटाच्या रिलीजची चाहत्यांना प्रतीक्षा लागलीय. १०) टीम इंडियाच्या विजयासाठी काशीत हवन टी-२० विश्वचषक २०२६ च्या भारत विरुद्ध न्यूझीलंड महाअंतिम सामन्यासाठी संपूर्ण देश सज्ज झालाय. आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीपूर्वी, भारतीय संघाच्या विजयासाठी वाराणसीच्या अस्सी घाटावर क्रिकेट चाहत्यांनी विशेष हवन आणि पूजन केले. “भारतीय खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करून विश्वचषक घरी आणावा,” अशी भावना चाहत्यांनी व्यक्त केलीय. हवामान खात्याच्या माहितीनुसार, अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता नगण्य असून आकाश निरभ्र राहील. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आणि मिचेल सँटनरचा न्यूझीलंड संघ विजेतेपदासाठी आमनेसामने ठाकले आहेत.