नाशिक: वणीच्या सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतताना रात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या टेम्पोला ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 4 भाविकांचा जागीच मृत्यू, तर 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात नाशिक रस्त्यावरील कृष्णगाव येथे घडला.
सागर ठाकूर (वय 22), कुणाल ठाकूर (19), गणेश ठाकूर (38) आणि आशिष ठाकूर (27) अशी मृतांची नावे आहेत. नाशिकच्या वणी गडावर प्रसिद्ध सप्तश्रृंगी देवीचे मंदीर आहे. मुलाच्या धार्मिक कार्यक्रमासाठी त्र्यंबकेश्वर येथील माणिक ठाकूर हे त्यांच्या नातेवाईकांसह रविवारी सप्तश्रृंगी गडाकडे रवाना झाले होते. दुपारी दीड वाजता धार्मिक कार्यक्रम आटोपल्यावर ते सर्वजण रात्री साडेआठ वाजता परतीच्या प्रवासाला निघाले.
त्यानंतर रात्री 12 वाजेच्या सुमारास दहा किलोमीटर अंतरावर वणी-नाशिक मार्गावरील कृष्णगाव येथे रस्त्याच्या कडेला टेम्पो उभा होता. यावेळी वणीहून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या एका मालवाहू ट्रकने रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या टेम्पोला पाठिमागून जोरदार धडक दिली. हा अपघात प्रचंड भीषण होता की चौघे जण जागीच ठार झाले. तर ललीता ठाकूर, अनिल ठाकूर, ध्रुप ठाकूर, रंजिता ठाकूर, माणिक ठाकूर आणि पल्लवी ठाकूर हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहे. अपघातानंतर जखमी भाविकांनी प्रचंड आक्रोश केल्याने ग्रामस्थ जागे झाले आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. त्यानंतर सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून पुढील तपास सुरू आहे.