Brij Bhushan Singh : चिथावणीखोर वक्तव्ये करणाऱ्यांची सुरक्षा काढून घ्यावी; माजी खासदार ब्रिजभूषण सिंह यांची मागणी

लखनौ : चिथावणीखोर वक्तव्ये करणाऱ्यांची सरकारी सुरक्षा काढून घेतली जावी, अशी मागणी भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी सोमवारी केली. संबंधित मुद्द्यावर भूमिका मांडताना त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचेही उदाहरण दिले.
समाजवादी पक्षाचे नेते रामजीलाल सुमन यांनी राणा सांगा यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून उत्तरप्रदेशातील राजकारण तापले आहे. त्या पार्श्वभूमीवर, ब्रिजभूषण यांनी सुमन यांच्यावर निशाणा साधला. वादग्रस्त वक्तव्ये करायची असतील तर सुमन यांच्यावरच स्वत:च्या सुरक्षेची जबाबदारी सोपवायला हवी. धर्म, जात, महान व्यक्तिमत्वांविषयी अनावश्यक वक्तव्ये करून तणाव निर्माण करणाऱ्यांना सरकारी सुरक्षा पुरवली जाऊ नये.
सुरक्षेचा खेळ संपवला जात नाही; तोपर्यंत चिथावणीखोर वक्तव्यांचे सत्र सुरू राहील, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात मनसेच्या कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांवर हल्ले केले. त्यावेळी राज ठाकरे यांची सरकारी सुरक्षा कायम होती. सरकारी सुरक्षेमुळे आणखी चिथावणीखोर वक्तव्ये करण्यासाठी प्रोत्साहनच मिळते, अशी टिप्पणीही त्यांनी केली.





