Kerala RSS FIR | फुलांची रांगोळी आणि भगवा झेंडा बनला गुन्हा ; केरळमध्ये RSS च्या 27 स्वयंसेवकांवर गुन्हा दाखल करण्याचं कारण काय?

कोल्लम – केरळमधील कोल्लम जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) च्या 27 स्वयंसेवकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आली आहे. या स्वयंसेवकांवर आरोप आहे की त्यांनी श्री पार्थसारथी मंदिर, मुथुपिलक्काडू येथे जाणाऱ्या रस्त्यावर ‘ऑपरेशन सिंदूर’ या थीमवर आधारित एक पुष्प रांगोळी (पुक्कलम) साकारली होती आणि त्यात भगवा झेंडा देखील तयार केला होता. ही रांगोळी ओणम सणाच्या काळात तयार करण्यात आली होती. सस्थमकोट्टा पोलिसांनी ही एफआयआर दाखल केली आहे.
मंदिर समितीने दावा केला की, ही पुष्प रांगोळी आणि सजावट केरळ उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन आहे. याबाबत त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भाजपने पोलिसांच्या या कृतीचा निषेध करत म्हटले आहे की, मुथुपिलक्काडू येथील पार्थसारथी मंदिरात तयार करण्यात आलेली ही रांगोळी ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या सन्मानार्थ होती.
मंदिर समितीचे पदाधिकारी अशोकन सी. यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 223 (लोकसेवकांच्या वैध आदेशांचे उल्लंघन), 192 (दंगल भडकावण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक उकसवणे) यासह इतर कलमांतर्गत एफआयआर नोंदवली आहे.एफआयआरनुसार, आरोपितांनी मंदिराच्या मुख्य रस्त्यावर RSS चा झेंडा दाखवणारी पुष्परांगोळी तयार केली होती, जी की उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात होती.
न्यायालयाने आधीच स्पष्ट आदेश दिले होते की मंदिर परिसरात मंदिर समितीच्या परवानगीशिवाय कोणतीही सजावट, फ्लेक्स बोर्डसह करता येणार नाही. मंदिरापासून 50 मीटर अंतरावर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक फ्लेक्स बोर्ड देखील लावण्यात आला होता. आरोप आहे की यामागचा उद्देश प्रतिस्पर्धी राजकीय गटांमध्ये हिंसा भडकवण्याचा होता.
उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन..
मंदिर समितीचे सदस्य मोहनन यांनी सांगितले की, सणांच्या काळात मंदिराजवळ झेंडे लावण्यावरून यापूर्वी अनेक वेळा वाद झाले आहेत. त्यामुळे अशा वादांना टाळण्यासाठी त्यांनी केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने 2023 मध्ये आदेश दिला होता की मंदिर परिसराजवळ कोणत्याही प्रकारची सजावट, झेंडे यावर बंदी घालण्यात यावी.मोहनन म्हणाले की, या आदेशानंतरही RSS स्वयंसेवकांनी मंदिर समितीच्या पुष्परांगोळीच्या शेजारीच आपला झेंडा असलेली पुष्परांगोळी तयार केली आणि त्यात ‘ऑपरेशन सिंदूर’ असे लिहिले. यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाले आणि वाद निर्माण होण्याची शक्यता होती, म्हणूनच तक्रार दाखल करण्यात आली.
भाजप आक्रमक : केरल हे पाकिस्तान नाही…
भाजपचे केरळ प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर म्हणाले की, देशात पहिल्यांदाच फुलांची रांगोळी तयार केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओणम हा मलयाळी समाजाचा उत्सव आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ लिहिल्यामुळे कायदेशीर कारवाई करून सरकार नेमके काय साध्य करू पाहत आहे?ते पुढे म्हणाले की, ‘ऑपरेशन सिंदूर’ हे भारतीय सशस्त्र दलाच्या शौर्याचे प्रतीक आहे, आणि यावर कारवाई करणे म्हणजे देशाचे रक्षण करणाऱ्या प्रत्येक सैनिकाचा अपमान आहे.
भाजप प्रदेशाध्यक्षांनी सांगितले की, केरळ हे ना जमात-ए-इस्लामीद्वारे शासित प्रदेश आहे, ना पाकिस्तान आहे, आणि ते कधीच तसे होणार नाही. केरळ पोलिसांनी हे विसरू नये की, ते भारतात आहेत. त्यांनी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याकडे ही एफआयआर तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे.





