Odisha Flood : ओडिशात महापुराचा धोका; १० जिल्ह्यांना हाय अलर्ट !
ओडिशामध्ये पुराचे ढग अधिक गडद झाले आहेत. हिराकुड धरणातून सोडण्यात आलेले जादा पाणी रविवारी कटकमधील मुंडाली येथे पोहोचल्याने महानदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे.

Odisha Flood – ओडिशामध्ये पुराचे ढग अधिक गडद झाले आहेत. हिराकुड धरणातून सोडण्यात आलेले जादा पाणी रविवारी कटकमधील मुंडाली येथे पोहोचल्याने महानदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीच्या १० जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हिराकुड धरणाचे २२ दरवाजे उघडून पाणी सोडल्यानंतर राज्य सरकारने महानदी खोऱ्यातील १० जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हे पाणी खोरधा, कटक, पुरी, केंद्रपाडा आणि जगतसिंगपूर या सखल भागात नुकसान पोहोचवू शकते, त्यामुळे अधिकाऱ्यांना पूर्णपणे सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार सोमवार सकाळपर्यंत राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यामध्ये बालेश्वर, भद्रक, जाजपूर, केंद्रपाडा, जगतसिंगपूर, कटक, सुंदरगड, अनुगुल, ढेंकनाल, केओंझार, मयुरभंज, कालाहांडी, नवरंगपूर, रायगडा, कोरापुट, मलकानगिरी, गजपती, गंजम, पुरी, खोरधा आणि नयागड या जिल्ह्यांचा समावेश आहे. दरम्यान, उत्तर ओडिशात आलेल्या पुरामुळे आधीच ८ लाखांपेक्षा जास्त नागरिक प्रभावित झाले आहेत.





