Financial Fraud – अवघ्या काही दिवसांत गुंतवणुकीवर 4 ते 10 पट परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून उरुळी कांचन येथील एका लँड डेव्हलपरची तब्बल 12 कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आशिष एकनाथ कांचन (वय 39, रा. एरिगेशन कॉलनी, उरुळी कांचन) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रविण तुळशीराम संकपाळ (रा. प्रोग्रेसिव्ह बिल्डिंग, वाशी, नवी मुंबई) आणि त्याची कंपनी हरेकृष्णा इंडस्ट्रियल अॅन्ड लॉजिस्टिक पार्क्स प्रा. लि. यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष कांचन हे 2008 पासून जमीन खरेदी-विक्री व लँड डेव्हलपिंगचा व्यवसाय करतात. व्यवहारात त्यांचा पुतण्या अभिषेक अरविंद कांचन हा कधी कधी भागीदार म्हणून सोबत असतो. मार्च 2022 मध्ये अभिषेक कांचनच्या ओळखीतील व्यक्तींमार्फत आशिष कांचन यांची प्रविण संकपाळ याच्याशी कवडीपाट येथील जयश्री हॉटेलमध्ये भेट झाली. या वेळी संकपाळने एमआयडीसी परिसरात कंपन्यांसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करत असल्याचे सांगून स्वतःची ओळख करून दिली. त्यानंतर एमआयडीसी परिसरातील जमिनीत गुंतवणूक केल्यास 4 ते 10 पट नफा मिळतो, असे सांगून कांचन यांना गुंतवणुकीस प्रवृत्त केले. संकपाळच्या बोलण्यावर विश्वास ठेवून 23 मार्च 2022 रोजी कांचन यांनी 50 लाख रुपये आरटीजीएसद्वारे त्याच्या कंपनीच्या खात्यावर वर्ग केले. त्यानंतर दोन-तीन दिवसांतच संकपाळने त्यांना पुन्हा जयश्री हॉटेलमध्ये बोलावून 25 लाख रुपये रोख नफा दिला. यानंतर 30 मार्च 2022 रोजी झालेल्या दुसर्या भेटीत संकपाळने आंध्रप्रदेशातील पेंडुकोडा येथे किया कंपनीसमोर 28 एकर जागेवर लॉजिस्टिक गोडाऊन प्रकल्प उभारण्याचे आमिष दाखवले. या प्रकल्पात गुंतवणूक केल्यास मोठा फायदा होईल असे सांगून त्याने 4 कोटी 85 लाख रुपये गुंतवण्यास सांगितले. त्यानुसार 5 एप्रिल ते 11 एप्रिल 2022 दरम्यान आशिष कांचन व अभिषेक कांचन यांनी विविध बँक खात्यांतून ही रक्कम त्याच्या कंपनीच्या खात्यात वर्ग केली. एप्रिल ते ऑगस्ट 2022 या कालावधीत संकपाळने वारंवार अधिक गुंतवणुकीची मागणी केली. त्यानुसार आशिष कांचन व त्यांच्या भागीदाराने वेळोवेळी एकूण 12 कोटी 60 लाख 55 हजार रुपये त्याच्या वैयक्तिक व कंपनीच्या खात्यांवर वर्ग केले. या गुंतवणुकीच्या बदल्यात डिसेंबर 2022 पर्यंत तब्बल 35 कोटी रुपयांचा परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. दरम्यान, गुंतवणुकीच्या सुरक्षेसाठी संकपाळने प्रत्येकी 5 कोटी रुपयांचे तीन चेक दिले होते. मात्र 5 नोव्हेंबर 2022 रोजी भरलेला चेक खात्यात रक्कम नसल्याने बाउन्स झाला. त्यानंतर 28 नोव्हेंबर 2023 रोजी दुसरा चेक भरला असता तोही खाते बंद असल्याने वटला नाही. त्यानंतर संकपाळने वारंवार वेगवेगळी कारणे देत पैसे देण्यास टाळाटाळ केली. चौकशीदरम्यान 15 जून 2025 पर्यंत त्याने केवळ 61 लाख 40 हजार रुपये ऑनलाइन परत केले, तर उर्वरित 11 कोटी 99 लाख 15 हजार रुपये परत केले नाहीत. या प्रकरणी आशिष कांचन यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केल्यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.