RSS बंदीच्या मागणीवर फडणवीसांचा काँग्रेसला टोला; म्हणाले, “इंदिरा गांधींनाही सत्तेतून पायउतार व्हावं लागलं”

मुंबई : कर्नाटकातील काँग्रेस नेते आणि मंत्री प्रियांक खरगे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) सरकारी जागांवरील शाखा आणि कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. प्रियांक खरगे यांच्या मागणीला प्रसिद्धीचा स्टंट ठरवत फडणवीसांनी इंदिरा गांधींनी संघावर बंदी घातल्यानंतर त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागल्याची आठवण करून दिली.
कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खरगे यांनी मुख्य सचिवांना पत्र लिहून सरकारी शाळा, सार्वजनिक उद्याने आणि धार्मिक स्थळांवर संघाच्या शाखा, बैठका आणि परेडवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. संघाच्या कार्यक्रमांमुळे मुलांच्या मनात नकारात्मक विचारांची पेरणी होत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “प्रियांक खरगे हे प्रसिद्धीसाठी अशा गोष्टी करतात. त्यांना कोणताही आधार नाही. ते आपल्या वडिलांच्या, म्हणजेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या, भरवशावर राजकारण करत आहेत. संघावर यापूर्वीही बंदी घालण्याचे प्रयत्न झाले. ज्या इंदिरा गांधींनी बंदी घातली, त्यांना सत्तेतून बाहेर जावे लागले.”
संघ ही सांस्कृतिक शक्ती : फडणवीस –
फडणवीस पुढे म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक सांस्कृतिक शक्ती आणि देशभक्त संघटना आहे. राष्ट्रीय विचारांनी प्रेरित आणि मूल्याधारित मानवनिर्मितीचे कार्य संघ करतो. प्रसिद्धीसाठी अशी पत्रे लिहिणाऱ्यांकडे आम्ही ढुंकूनही पाहत नाही.” प्रियांक खरगे यांच्या मागणीला त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावले.
प्रियांक खरगे यांचे पत्र काय सांगते?
प्रियांक खरगे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “संघ सरकारी शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शने आयोजित करतो. यामुळे मुलांच्या आणि तरुणांच्या मनात नकारात्मक विचार पेरले जातात. काठ्या घेऊन प्रचारफेऱ्या काढल्या जातात, ज्यामुळे निरागस मुलांची मानसिकता बिघडते.” त्यांनी सरकारी आणि सरकारमान्य शाळा तसेच सार्वजनिक ठिकाणी संघाच्या सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
केरळमधील घटनेचा संदर्भ –
प्रियांक खरगे यांच्या मागणीला केरळमधील एका घटनेची पार्श्वभूमी आहे. तिरुवनंतपुरम येथील २६ वर्षीय अभियंत्याने ९ ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली. सुसाइड नोटमध्ये त्यांनी संघाच्या शिबिरात लैंगिक शोषण झाल्याचा आरोप केला होता. या घटनेचा आधार घेत प्रियांक खरगे यांनी संघावर बंदीची मागणी केली आहे. मात्र, फडणवीसांनी ही मागणी धुडकावत संघाला सांस्कृतिक आणि देशभक्त संघटना म्हंटले आहे.
प्रियांक खरगे यांच्यावर टीका –
प्रियांक खरगे यांच्यावर टीका करताना फडणवीस म्हणाले, “प्रियांक खरगे यांना राजकीय आधार नाही. ते केवळ आपल्या वडिलांच्या नावावर राजकारण करतात. संघावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांना इतिहासाची जाणीव असायला हवी. संघावर बंदी घालण्याचे प्रयत्न यापूर्वीही अयशस्वी ठरले आहेत.” या प्रकरणावरून कर्नाटक आणि महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.





