नाशिक : शरद पवारजी तुमची मानसिकताच राजेशाही होती. सेवकाचे काम असते जनतेमध्ये जाऊन हिशोब देणे. म्हणून लोकांनी तुमचा पराभव करुन सेवकांना निवडून दिले. यापुढेही ते सेवकांना निवडून देतील. कॉंग्रेसचे तर महाराष्ट्रात अस्तित्वच दिसत नाही. गेल्या निवडणुकीत मोदींचे नेतृत्त्व आणि शिवरायांचा आशिर्वाद होता, आता तर त्यांच्या वंशाचीही आम्हाला सोबत आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना सडेतोड प्रत्युत्तर दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेची समारोप सभा नाशिकमधील पंचवटीतील तपोवनात पार पडली. याप्रसंगी महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, रामदास आठवले, गिरिश महाजन, उदयनराजे भोसले यांच्याबरोबरच राज्यातील भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते.
फडणवीस यांनी आपल्या भाषणामधून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शरद पवार यांच्यावर टीका केली. तसेच त्यांनी पाच वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कामाची थोडक्यात माहिती दिली. तर मुंडे यांनाही कॉंग्रेस, राष्ट्रवादीवर निशाणा साधला. राज्याला राष्ट्रवादी कॉंग्रेस मुक्त करण्याचे स्वप्न आहे. भाजप हा जातीपातीला थारा न देणारा पक्ष आहे, असे मुंडे म्हणाल्या. खुद्द शरद पवार जरी बीड शहरातून निवडणुकीला उभे राहिले तरी बीडची जनता त्यांना निवडून देणार नाही, असेही विधान पंकजा मुंडे यांनी केले आहे.