‘फक्त 20-25 मिनिटाच्या अंतराने आमचे प्राण वाचले…’, शेख हसीना यांचा हत्येच्या कटाबाबत धक्कादायक खुलासा

Sheikh Hasina: बांगलादेशात झालेल्या हिंसक आंदोलनानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडावा लागला होता. आरक्षण विरोधात सुरू झालेले आंदोलन हिंसाचारात बदलल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर शेख हसीना यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देत भारतात आश्रय घेतला आहे. आता शेख हसीना यांनी त्यांना व त्यांची बहिण शेख रेहानाची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता, असा दावा केला आहे.
बांगलादेश आवामी लीगच्या फेसबुक पेजवर एक ऑडिओ मेसेज शेअर करण्यात आला आहे. या ऑडिओ मेसेजमध्ये शेख हसीना यांनी अनेक खुलासे केले आहेत. सोबतच, त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता, असाही दावा केला आहे. या ऑडिओ मेसेजमध्ये त्या म्हणाल्या की, ‘मी व रेहाना वाचले. केवळ 20-25 मिनिटाच्या अंतराने आमचे प्राण वाचले.’
बांगलादेशात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनात जवळपास 600 लोकांना प्राण गमवावे लागले होते. हिंसाचारानंतर शेख हसीना यांना देश सोडावा लागला होता. त्यानंतर आता बांगलादेशमध्ये नोबेर पुरस्कार विजेते मोहम्मद यूनुस यांच्याकडे अंतरिम सरकारचे नेतृत्व आहे.
फेसबुकवर पोस्ट केलेल्या ऑडिओ मेसेजमध्ये शेख हसीना म्हणाल्या की, त्यांनी मला मारण्याचा कट रचला होता. अल्लाहच्या कृपेने मी अजूनही जिवंत आहे. कारण, अल्लाहची इच्छा आहे की मी काहीतरी वेगळे करावे.
त्या म्हणाल्या की, 21 ऑगस्टला झालेल्या हत्येतून वाचणे, कोटालीपारा येथील बॉम्बस्फोट असो अथवा 5 ऑगस्ट 2024 ला सुरक्षित बाहेर पडणे, ही सर्व देवाची इच्छा आहे. देवाचाच आशीर्वाद असेल, अन्यथा यावेळी माझे प्राण वाचले नसते.
दरम्यान, ऑगस्ट 2004 मध्ये ढाका येथे आयोजित दहशतवाद विरोधी रॅलीमध्ये शेख हसीना यांना निशाणा बनवत ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. या घटनेत हसीना या थोडक्यात बचावल्या होत्या, तर या घटनेत 24 जणांचा मृत्यू झाला होता. कोटालीपुरा येथेही त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. याच घटनेचा शेख हसीना यांनी ऑडिओ मेसेजमध्ये उल्लेख केला आहे.





