मुंबई : महायुतीला मिळालेल्या बहुमतानंतर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झालं. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार १५ डिसेंबर रोजी पार पडला. यामध्ये एकूण 33 कॅबिनेट तर 6 राज्य मंत्र्यांनी शपथ घेतली. भाजपाचे १९ मंत्री, शिवसेना शिंदे गटाला ११ मंत्री आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला ९ मंत्रीपदे देण्यात आली आहेत. मंत्रिमंडळात अनेक माजी मंत्र्यांना आणि दिग्गज नेत्यांना डावलण्यात आल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेच्याही अनेक मोठ्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे काही माजी मंत्री पक्षाच्या नेतृत्वावर नाराज आहेत. मात्र, मंत्रिपद न मिळाल्यामुळे नेत्यांची नाराजी दूर करण्याच्या पार्श्वभूमीवर आणि सर्वांना मंत्रिपदाची संधी मिळावी म्हणून मंत्र्यांना अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला राबवण्यात येणार असल्याचे एकनाथ शिंदेकडून सांगण्यात आले आहे. ‘या’ नेत्याने उघडपणे जाहीर केली नाराजी “मला माझं नाव मंत्रिमंडळातून कट झाल्याचं दु:ख नाही. पण लोकांना विश्वासात घेऊन काम करायला पाहिजे. मात्र, तसं न झाल्यामुळे शंभर टक्के नाराजी आहे”, असं विजय शिवतारे यांनी म्हटलं. तसेच आता पुढची भूमिका काय? असं विचारलं असता शिवतारे यांनी म्हटलं की, आता अडीच वर्षांनंतर मंत्रिपद दिलं तरी मी घेणार नाही. मला त्याची आवश्यकता नाही. मला माझ्या मतदारसंघातील कामं करून घेणं महत्वाचं आहे. मला मंत्रिपदाबाबत राग नाही. पण वागणुकीबाबत जास्त राग आहे”, असे म्हणत विजय शिवतारे यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली.