नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर झाला असून, यामुळे महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Politics) आणि भाजप नेते, मंत्री गणेश नाईक यांच्यातील वाद या प्रभाग रचनेवरून अधिक तीव्र झाला आहे. गणेश नाईक यांनी प्रभाग रचनेविरोधात निवडणूक आयोगाला कडक इशारा देत, आरोपांमध्ये तथ्य असतानाही दुर्लक्ष झाल्यास थेट कोर्टात जाण्याची भूमिका घेतली आहे. शिंदेंवर नाईकांचा गंभीर आरोप गणेश नाईक यांनी आरोप केला आहे की, एकनाथ शिंदे (Eknath Shinde Politics) यांनी नगरविकास खात्याच्या माध्यमातून स्मार्ट खेळी खेळत भाजपच्या प्रभावी माजी नगरसेवकांचे बालेकिल्ले तोडण्याचा प्रयत्न केला आहे. नवी मुंबईतील प्रभाग रचनेमुळे भाजपच्या २४ माजी नगरसेवकांना थेट फटका बसला आहे. नाईक यांनी म्हटले की, “रहिवाशी भागांचे प्रभाग तोडण्यात आले असून, निवडणूक आयोगाने याकडे दुर्लक्ष केल्यास नागरिक न्यायालयाचा दरवाजा ठोठावतील.” या प्रभाग रचनेवर भाजपनेही तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. प्रभाग रचनेचा वाद महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांनी १११ सदस्यसंख्येच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर केला. यात २७ प्रभाग चार सदस्यांचे आणि एक प्रभाग तीन सदस्यांचा आहे. मात्र, हा आराखडा जाहीर होताच वादाच्या भोवऱ्यात सापडला. नाईक समर्थकांनी या रचनेवर “ठाण्याचा प्रभाव” असल्याचा थेट आरोप केला आहे. नवी मुंबईच्या राजकारणात गणेश नाईक यांची मजबूत पकड आहे, परंतु या प्रभाग रचनेमुळे त्यांच्या प्रभावाला धक्का बसण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तणाव सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील प्रभाग रचनेचा मुद्दा अधिक गंभीर बनला आहे. शिंदे यांनी नाईक यांना त्यांच्या गडावर, नवी मुंबईतच आव्हान दिल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. नाईक यांच्या कोर्टात जाण्याच्या इशाऱ्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेवरून महायुतीतील हा वाद आता कायदेशीर लढाईपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. गणेश नाईक यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि शिंदे यांच्या कथित रणनीतीमुळे नवी मुंबईच्या राजकारणात नवे वळण येण्याची चिन्हे आहेत. निवडणूक आयोग आणि न्यायालय या प्रकरणात काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.