१) मुंबईत ‘हाताला ‘वंचित’ची साथ राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना मुंबईत मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळतेय. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची युती अखेर जाहीर झालीय. आज झालेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केलीय. या युतीत काँग्रेस १५६ जागांवर तर वंचित बहुजन आघाडी ६२ जागांवर उमेदवार देणार आहे. याबाबतचं अधिकृत पत्रक वंचितने सोशल मीडियावर शेअर केलंय. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला केवळ ९ जागांचा प्रस्ताव असल्याने ते स्वबळावर लढण्याची शक्यता वर्तवली जातेय. २) शरद पवार माझे मार्गदर्शक-गौतम अदानी गौतम अदानी यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळत ते माझे मार्गदर्शक असल्याचा उल्लेख केलाय. उद्योगपती गौतम अदानी पुन्हा एकदा बारामतीच्या दौऱ्यावर आलेत. त्यांच्या दौऱ्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार स्वागतासाठी एकत्र होते. शरद पवार यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या एआय सेंटरचे अदानी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. शरद पवार माझ्यासाठी आदरणीय आणि आदर्श आहेत. दीर्घकालीन राजकारणामध्ये शरद पवार यांनी खूप मोठे सामाजिक काम उभारलंय, असं म्हणत गौतम अदानींनी शरद पवारांचं कौतुक केलंय. त्यांचे हे विधान राज्यभरात चर्चेचा विषय बनलाय. ३) सोलापुरात एकनाथ शिंदेंचा भाजपाला दणका- महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळतोय. येथे एकनाथ शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी थेट युतीची घोषणा करत भाजपाला जोरदार धक्का दिलाय. सोलापूर महापालिकेसाठी दोन्ही पक्ष ५१–५१ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. शिंदे गटाचे नेते सिद्धराम म्हेत्रे यांनी ही माहिती दिलीय. भाजपाकडे ४० जागांची मागणी केली होती, मात्र त्यांनी फक्त ८ जागा देऊ केल्याने चर्चा थांबली, असं म्हेत्रे म्हणालेत. शहराच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. या नव्या प्रयोगामुळे आता सोलापुरातील राजकीय गणित बदलण्याची शक्यता वर्तवली जातेय. ४) बंडू आंदेकर खेळला मोठी चाल- पुण्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी खळबळ उडालीय. आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर थेट तुरुंगातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात दाखल झाला. तोंडावर काळं कापड, पोलिसांच्या दोरखंडात जखडलेला आणि कडक बंदोबस्तात असलेला बंडू आंदेकर अर्ज भरताना विजयाची खूण दाखवत होता. यावेळी त्याने “नेकी का काम, आंदेकर का नाम”, “आंदेकरांना मत म्हणजे विकासाला मत”, अशा घोषणा दिल्या. मात्र, आंदेकर कुटुंबातील तिघांचेही अर्ज अर्धवट असल्याने ते स्वीकारले गेले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्तासाठी केलेली मेहनत वाया गेली. यामुळे बंडू आंदेकर पुन्हा एकदा कारागृहातून बाहेर येण्यासाठी ही चाल खेळला असल्याचे बोलले जातंय. न्यायालयाने सशर्त परवानगी दिली असतानाही बंडू आंदेकरने घोषणाबाजी केल्याचं दिसून आलं. आता तिघांनाही पुन्हा अर्ज भरण्यासाठी यावं लागणार आहे. ५) कृष्णराज महाडिकांनी उमेदवारी अर्ज भरला अन् अचानक माघार कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अचानक मोठा बदल पाहायला मिळतोय. माजी खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अवघ्या २४ तासांत निवडणुकीतून माघार घेतलीय. प्रभाग क्रमांक तीनमधून त्यांनी शनिवारी अर्ज दाखल केला होता, मात्र रविवारी अधिकृत निवेदन देत निवडणूक न लढवण्याची घोषणा केलीय. भाजपच्या वरिष्ठ पातळीवर आमदार आणि खासदारांच्या कुटुंबीयांना तिकीट न देण्याचा निर्णय झाल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलंय. पक्षाचा आदेश शिरसावंद्य असल्याचं सांगत, पुढेही समाजकारण आणि पक्षकार्यात सक्रिय राहणार असल्याचं कृष्णराज महाडिक यांनी स्पष्ट केलंय. ०६) गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता ‘लिंचिस्तान’ झालाय- जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर तीव्र शब्दांत टीका केलीय. महात्मा गांधी आणि पंडित नेहरूंनी ज्या भारताचं स्वप्न पाहिलं होतं, तो भारत आता ‘लिंचिस्तान’मध्ये बदलत चाललाय. देशातील विविध राज्यांमध्ये घडणाऱ्या मॉब लिंचिंगच्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी चिंता व्यक्त केली. तसेच सध्या देशात भीती आणि असहिष्णुतेचं वातावरण असल्याचं त्या म्हणाल्यात. अशा घटना केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नसून, सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि प्रतिष्ठेला मोठा धोका असल्याचं मत मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केलंय. ०७) Gmail वापरकर्त्यांसाठी गुगलने आणले नवीन फीचर Gmail वापरकर्त्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ज्याची वाट पाहिली जात होती, ते फीचर आता गुगल लवकरच आणणार आहे. आता वापरकर्त्यांना आपला जुना किंवा विचित्र वाटणारा Gmail आयडी बदलता येणार आहे, तोही नवीन खाते न उघडता. विशेष म्हणजे ईमेल बदलल्यानंतरही जुना डेटा, फोटो, कॉन्टॅक्ट्स किंवा ड्राइव्हमधील फाइल्स डिलीट होणार नाहीत. नवीन अपडेटनुसार, जुना ईमेल आयडी ‘एलियास’ म्हणून खात्याशी जोडलेला राहणारय. म्हणजे जुन्या पत्त्यावर आलेले मेल थेट नवीन इनबॉक्समध्ये मिळणार आहेत. वर्षातून फक्त एकदाच आणि आयुष्यात जास्तीत जास्त तीन वेळा ईमेल आयडी बदलण्याची परवानगी असेल. या फीचरची सुरुवात भारतातून होण्याची शक्यताय. त्यामुळे बालपणी केलेली ईमेल आयडीची ‘चूक’ सुधारण्याची संधी आता मिळणारय. ०८) आम्ही बंकरमध्ये लपण्याच्या मार्गावर होतो- जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत जोरदार हवाई कारवाई केली होती. या कारवाईमुळे भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता. आता पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी कबुली दिलीय. ऑपरेशन सिंदूरदरम्यान वाढलेल्या तणावामुळे त्यांना बंकरमध्ये लपण्याचा सल्ला देण्यात आला होता. पाकिस्तानच्या लष्करी सचिवांनीच हा सल्ला दिल्याचं झरदारी यांनी स्पष्ट केलंय. भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तान किती दबावात आला होता, याचं हे मोठं उदाहरण मानलं जातय. ०९) नोरा फतेही पुन्हा प्रेमात बॉलिवूडची प्रसिद्ध डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेही पुन्हा एकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आलीय. दिलबर, साकी साकी, कुसू कुसू यांसारख्या सुपरहिट गाण्यांमुळे लोकप्रिय ठरलेली नोरा आता प्रेमात असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्यात. नोरा एका प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूला डेट करत असल्याचं सांगितलं जातंय. यासाठी ती आफ्रिकन कप ऑफ नेशन्स २०२५चा सामना पाहण्यासाठी मोरोक्कोला गेली होती, अशी माहिती समोर आलीय. दुबई आणि मोरोक्कोमध्ये ती एकाच व्यक्तीसोबत दिसल्याने या चर्चा आणखी रंगल्यात. मात्र, नोराने याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. ती सध्या तिच्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत असून वैयक्तिक आयुष्य गुप्त ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. त्यामुळे नोरा खरंच नव्या प्रेमात आहे का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. १०) विराटच्या पुनरागमनासाठी सिद्धूंची भावनिक साद- भारतीय दिग्गज फलंदाज विराट कोहली सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्मातय. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने २ सामन्यांत २०० हून अधिक धावा कुटल्या, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धही दोन शतके झळकावली. या धमाकेदार कामगिरीनंतर माजी क्रिकेटपटू नवजोत सिंह सिद्धू यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केलीय. सिद्धू यांनी विराटला ‘२४ कॅरेट सोने’ संबोधत, त्याची फिटनेस २० वर्षांच्या तरुणासारखी असल्याचे म्हटलंय. “जर देवाने मला एक इच्छा मागण्याची संधी दिली, तर मी विराटला कसोटी निवृत्ती मागे घेण्याची विनंती करेन,” अशी इच्छा त्यांनी व्यक्त केलीय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील संघर्षानंतर विराटने कसोटीतून निवृत्ती घेतली होती. आता तो केवळ मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत आहे.