Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना जबर धक्का; आपत्ती व्यवस्थापन समितीतून वगळले, ‘त्या’ योजनाही करणार बंद?

मुंबई : राज्याच्या निवडणुकीचा निकाल लागल्यापासून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. अशातच आता भाजप आणि शिवसेनेत दुरावा निर्माण झाल्याचे संकेत देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीमधून उपमुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना वगळण्यात आले आहे. तर या नव्या समितीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मुंबईतील जुलै 2005 सालच्या पुरानंतर आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली होती. आपातकालीन परिस्थितीत ही समिती राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे काम करते. मुख्यमंत्री हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने या समितीच्या प्रमुखपदाची सूत्रं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली आहेत. या नव्या समितीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही स्थान देण्यात आले आहे. महसूल, मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन व आरोग्यमंत्री या समितीवर आहेत. मात्र, नगरविकासचे मंत्री एकनाथ शिंदे नाहीत, त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चलबिचल सुरु झाली आहे.
एकनाथ शिंदेंनी सुरु केलेल्या योजनांना ब्रेक?
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्रिपदी असताना एकनाथ शिंदे यांनी तीर्थदर्शन योजनेची घोषणा केली होती. ज्येष्ठ नागरिकांना प्रमुख स्थळांचे तीर्थदर्शन मोफत घडवले जात होते. मात्र आता ही तीर्थदर्शन योजना थांबवण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसांनी घेतला आहे. तसेच नव्या सरकारकडून ‘आनंदाचा शिधा’ आणि ‘शिवभोजन थाळी’ योजनाही बंद करण्याबाबत विचार सुरु असल्याच्या बातम्या येत आहेत.
दरम्यान, राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडू लागल्यामुळे ‘आनंदाचा शिधा’, ‘शिवभोजन थाळी’ आणि तीर्थदर्शन योजना या बंद करण्याच्या निर्णयापर्यंत सरकार आले आहे. मात्र, या योजना बंद होणार नसल्याचा दावा एकनाथ शिंदेंचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे. ते म्हणाले की, या योजनांचा खूपच कमी खर्च आहे, यामुळे याचा परिणाम आर्थिक गोष्टींवर होईल असे वाटत नाही. तसेच आपत्ती व्यवस्थापनच्या बैठकीत काय झाले हे माहिती नाही असंही प्रताप सरनाईक यावेळी म्हणाले.
माजी जिल्हा संपर्क प्रमुखांचा भाजपात प्रवेश
रायगड जिल्ह्यात देखील देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना धक्का दिला आहे. शिवसेनेतील नाराज माजी जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांना आपल्याकडे ओढण्यात भाजप यशस्वी झाला आहे. आज प्रकाश देसाई यांनी पाली येथील मेळाव्यात आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. लोकांची कामे करण्यासाठी अपेक्षित ताकद मिळत नव्हती. त्यामुळे भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे प्रकाश देसाई यांनी सांगितलं.





