Eknath Shinde – शिवसेना (यूबीटी) नेत्यांनी केवळ सत्तेच्या मोहापोटी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधासाठी हिंदुत्वाची विचारधारा आणि बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा वाऱ्यावर सोडला, असा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी बुधवारी केला. संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर जोरदार टीकास्त्र सोडले. खरी शिवसेना कोणाची, हा प्रश्न विचारला जातो, तेव्हा बाळासाहेब ठाकरे हीच दोन्ही गटांची ताकद असल्याचे दिसते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच बाळासाहेबांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेत आहेत. ते बाळासाहेबांच्या पाऊलावर पाऊल ठेवून हिंदुत्वाचा भगवा ध्वज फडकवत आहेत आणि भाजपसोबत सत्तेत सहभागी होऊन जनहित साधत आहेत, असे दुबे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी ज्या काँग्रेसशी बाळासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला, त्यांच्याशीच हातमिळवणी केल्याबद्दल दुबे यांनी संताप व्यक्त केला. सध्या उद्धव ठाकरे यांना संजय राऊत आणि अरविंद सावंत यांच्यासारखे नेते सल्ला देत आहेत, ज्यांचा हिंदुत्वाशी कोणताही संबंध नाही, असेही त्यांनी नमूद केले. केवळ सत्तेची प्राप्ती करणे हाच या नेत्यांचा एकमेव अजेंडा असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार अरविंद सावंत यांनी संसदेत बाळासाहेब ठाकरे यांच्या रिव्हॉल्व्हर लायसन्स संदर्भात विचारलेल्या प्रश्नाचा समाचार घेताना दुबे म्हणाले की, सावंत यांना ना इतिहास माहित आहे ना भूगोल. १९६९ मध्ये मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्यावर गोळीबार झाला होता, तेव्हा बाळासाहेब कोणत्याही घटनात्मक पदावर नव्हते. तरीही काँग्रेसने राजकीय षडयंत्र रचून त्यांना लक्ष्य केले होते. १९७६-७७ च्या सुमारास जेव्हा बाळासाहेबांना या कटाची जाणीव झाली, तेव्हा त्यांनी जाहीरपणे सांगितले होते की, मी मरेल पण इंदिरा गांधी किंवा काँग्रेससोबत कधीही तडजोड करणार नाही. आज उद्धव ठाकरे यांनी त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसून बाळासाहेबांच्या शब्दांचा अपमान केला आहे.