Economy News Updates: टाटा पॉवर सौरऊर्जा, साखर उत्पादन, व्यापार युद्ध ते सेंद्रिय निर्यात: अर्थव्यवस्था, शेती आणि तंत्रज्ञानातील महत्त्वाच्या घडामोडी!

टाटा पॉवरचा सौरऊर्जा पुरवठा वाढला
मुंबई – टाटा पॉवरचा महाराष्ट्रातील सौर ऊर्जापुरवठा वाढला आहे. यामुळे महाराष्ट्रात अक्षय ऊर्जा निर्मिती वाढण्यास मदत झाली असल्याचे या कंपनीने सांगितले. कंपनीने जारी केलेल्या पत्रकारानुसार महाराष्ट्रातील 230 सार्वजनिक संस्थांना टाटा पॉवरने सौरऊर्जा पुरवठा यशस्वीरित्या सुरू केला आहे. यामध्ये 107 मगावॅट स्वच्छ ऊर्जेचा समावेश आहे. 100 हॉस्पिटलना 3.6 मेगावॅट, 64 शाळांना दोन मेगावॅट, 72 सरकारी इमारतींना 100 मेगावॅट सौरऊर्जा पुरवठा करण्यात आला आहे, यामुळे 1.3 लाख टन कार्बन उत्सर्जन कमी झाले आहे. वीस लाख झाडे लावल्यानंतर एवढे कार्बन उत्सर्जन कमी होते.
0000000
तामिळनाडूचे अवकाश औद्योगिक धोरण
चेन्नई – विविध राज्यांदरम्यान विविध क्षेत्रात देशातील आणि परदेशातील गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. अशातच तामिळनाडू सरकारने अवकाश औद्योगिक धोरण जाहीर केले आहे. यामुळे अवकाशात उपग्रह पाठवणे त्याचे नियंत्रण करणे इत्यादी सेवा उपलब्ध होण्यासाठी मदत होणार आहे. देशातील इस्रो या संस्थेबरोबरच परदेशातील संस्था या धोरणाचा उपयोग करून घेऊ शकणार आहेत. त्यामुळे या क्षेत्रात तामिळनाडू अग्रेसर राहण्यास मदत होईल, अशी आशा तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलीन यांनी व्यक्त केली. विविध क्षेत्रात तामिळनाडू आघाडीवर राहण्यासाठी प्रयत्न करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
0000000
अर्थ मंत्रालय बँकांशी चर्चा करणार
नवी दिल्ली – अर्थ मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी सरकारी बँकांच्या मुख्य अधिकार्यांबरोबर सहा मे रोजी आढावा बैठक घेणार आहेत. या अगोदर ही बैठक या आठवड्यात घेतली जाणार असल्याचे सांगितले होती. मात्र नंतर या बैठकीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्या बैठकीत बँकांच्या कामकाजाचा आढावा घेण्याबरोबरच सरकारी योजनांची अंमलबजावणी कार्यक्षमरीत्या करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. सरकार जनधन योजना आणि मुद्रा योजनेची अंमलबजावणी अधिक आक्रमक आक्रमकपणे व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे.भारतातील बँकांची परिस्थिती उत्तम आहे. अशा परिस्थितीमध्ये भांडवल पुरवठा वाढून विकासदर वाढण्यास मदत व्हावी अशी सरकारची इच्छा आहे. सरलेल्या वर्षात बँकांचा नफा 31.3 टक्क्यांनी वाढून 1.19 लाख कोटी रुपयांवर गेला असल्याबद्दल सरकार समाधानी आहे.
0000000
आयसीआयसीआय बँकेकडून ठेवीवरील व्याजदरात कपात
मुंबई – भारतातील बँकाकडून कर्जावरील व्याजदराबरोबरच ठेवीवरील व्याजदरातही कपात करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात बर्याच बँकांनी कर्जावरील आणि ठेवीवरील व्याजदरात कपात जाहीर केली.
आता खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने ठेवीवरील व्याजदरात 0.25 टक्क्यापर्यंत कपात जाहीर केली आहे. आयसीआयसीआय बँकेने जाहीर केलेला माहितीनुसार आता बँकेच्या बचत खात्यावरील 50 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर व्याजदर कमी होऊन 2.75 टक्के होणार आहे. एचडीएफसी बँकेचा ही हाच व्याजदर आहे.
बचत खात्यातील 50 लाख रुपयांवरच्या रकमेवरील व्याजदर 0.25 टक्क्यांनी कमी करून 3.25% करण्यात आला आहे. भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेचा बचत खात्यावरील व्याजदर 2.70% आहे. रिझर्व बँकेने व्याजदरामध्ये अर्धा टक्के कपात केली आहे. त्याचबरोबर आगामी काळात व्याजदरात कपात होणार आहे. अशा परिस्थितीत व्यवसायिक बँकांनी आपल्या कर्ज आणि ठेवीवरील व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे बँकांच्या शेअरचे भाव सध्या उच्च पातळीवर आहे.
0000000
सेंद्रिय उत्पादनांची निर्यात वाढली
सरलेल्या वर्षात 665 दशलक्ष डॉलरची निर्यात
मुंबई – केंद्र सरकार आणि राज्य सरकार सेंद्रिय शेतीला चालना देण्याचा प्रयत्न करत असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. 2024 -25 या वर्षात भारताची सेंद्रिय उत्पादनाची निर्यात 34.6 टक्क्यांनी वाढून 665.96 दशलक्ष डॉलरवर गेली आहे.
त्या अगोदरच्या वर्षांमध्ये या सेंद्रिय उत्पादनाची निर्यात 494.8 दशलक्ष डॉलर इतकी होती. भारतातील सेंद्रिय डाळी, तेल, फळे, भाजीपाला इत्यादी उत्पादनांची मागणी विकसित देशाकडून वाढली असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने सांगितले आहे.
सरलेल्या वर्षामध्ये वजनात सेंद्रिय उत्पादनाचे निर्यात चार टक्क्यांनी वाढून 3.68 लाख टन इतकी झाली आहे. भारतीय सेंद्रिय उत्पादनांना जगातून मागणी वाढत असल्याचे यातून स्पष्ट होते. सेंद्रिय उत्पादन वाढावे आणि त्याची निर्यात वाढावी यासाठी वाणिज्य मंत्रालय आणि कृषी मंत्रालय समन्वयाने प्रयत्न करत आहेत. या उत्पादनांची निर्यात 2030 पर्यंत दोन अब्ज डॉलर पर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. सेंद्रिय उत्पादने प्रमाणीत करणे आणि शक्य तितक्या लवकर या उत्पादनाची निर्यात होण्यास मदत करणे इत्यादी योजना हाती घेण्यात आले आहेत.
जागतिक सेंद्रिय उत्पादन व्यापाराशी सुसंगत व्यापार धोरण तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. भारतातील सेंद्रिय उत्पादनांना जागतिक पातळीवर मान्यता मिळावी यासाठी या उत्पादनाचे स्टँडर्डडायजेशन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ईलॉन मस्क यांच्याशी चर्चा
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईलॉन मस्क यांच्याशी दूरध्वनीवरून परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांवर विधायक चर्चा केली. या वर्षाच्या सुरुवातीला वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या त्यांच्या भेटीदरम्यान चर्चेत समाविष्ट असलेल्या विषयांवर पुन्हा चर्चा झाली. या चर्चेतून तंत्रज्ञान विषयक प्रगतीसाठी सामायिक दृष्टिकोन अधोरेखित झाला.
तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात भारत आणि अमेरिका दरम्यान सहकार्याची प्रचंड क्षमता पंतप्रधानांनी अधोरेखित केली. या क्षेत्रात भागीदारी वाढवण्यासाठी भारताच्या दृढ वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.
पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे, की मस्क यांच्याशी बोललो. या वर्षाच्या सुरुवातीला वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या आमच्या भेटीदरम्यान ज्या विषयांवर चर्चा केली त्यासह विविध मुद्यांवर आम्ही चर्चा केली. आम्ही तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रातील सहकार्याच्या प्रचंड क्षमतेबाबत चर्चा केली. या क्षेत्रात अमेरिकेसोबतची आपली भागीदारी वृद्धिंगत करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे.
साखर उत्पादनात 18% घट
महाराष्ट्र, उत्तर प्रदेशातील उत्पादनावर परिणाम
नवी दिल्ली – यावर्षी आतापर्यंत साखरेचे उत्पादन 25.49 दशलक्ष टन झाले आहे. गेल्या वर्षी या कालावधीपर्यंत झालेल्या साखरेच्या उत्पादनापेक्षा हे उत्पादन 18 टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे देशातील साखर पुरवठा संतुलित राहावा यासाठी उपाययोजना करण्याची गरज वाढली असल्याचे दिसून येते.
इंडियन शुगर बायोएनर्जी अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन या साखर कारखानदारांच्या संघटनेने ही माहिती जारी केली आहे. या संघटनेने सांगितले की, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक या साखरेचे उत्पादन जास्त प्रमाणात घेणार्या राज्यात साखरेचे उत्पादन कमी झाल्यामुळे एकूण राष्ट्रीय उत्पादनात घट झाली असल्याचे दिसून येते.
या संघटनेने सांगितले की, महाराष्ट्र हा भारतातील सर्वात मोठा साखर उत्पादक प्रदेश आहे, मात्र महाराष्ट्रातील साखर उत्पादन 15 एप्रिल पर्यंत कमी होऊन केवळ 8.07 दशलक्ष टन इतके झाले आहे. गेल्या वर्षी 15 एप्रिल पर्यंत महाराष्ट्रात 10.94 दशलक्ष टन साखरेचे उत्पादन झाले होते. उत्तर प्रदेशातील साखर उत्पादन या कालावधीत कमी होऊन 9.11 दशलक्ष टन झाले. गेल्या वर्षी या कालावधीत उत्तर प्रदेशमध्ये 10.18 दशलक्ष तर साखरेचे उत्पादन झाले होते. कर्नाटक मधील उत्पादन कमी होऊन 4.04 दशलक्ष टन झाले आहे. जे की गेल्या वर्षी आतापर्यंत 5.06 दशलक्ष टन इतके झाले होते.
साखर हंगामाच्या सुरुवातीच्या काळात 534 साखर कारखान्यामध्ये साखरेचे उत्पादन सुरू झाले होते. मात्र आता केवळ 38 साखर कारखान्यांमध्ये साखरेचे उत्पादन सुरू आहे. कारण यावर्षी उसाचे प्रमाण कमी होत.े
इथेनॉलसाठी जास्त साखर
यावर्षी इथेनॉल उत्पादनासाठी 3.5 दशलक्ष टन साखर उपलब्ध केली जाणार आहे. गेल्या वर्षी इथेनॉल उत्पादनासाठी 2.15 दशलक्ष टन साखर उपलब्ध करण्यात आली होती. इथेनॉल निर्मिती वाढविण्याची गरज केंद्र सरकारने व्यक्त केल्यामुळे ही साखर उपलब्ध करण्यात येणार आहे. दरम्यान मुळात देशातच साखरेचे उत्पादन कमी होणार असल्यामुळे यावर्षी साखरेची निर्यात काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आता ग्रह्यात धरण्यात येऊ लागली आहे.
000000
जागतिक व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता वाढली
चीन -अमेरिका व्यापार युद्धाचा नकारात्मक परिणाम
जागतिक व्यापार संघटनेकडून स्पष्टीकरण जारी
नवी दिल्ली – अमेरिकेने सर्वच देशाविरोधात किमान दहा टक्के आयात शुल्क लावले आहे. त्याचबरोबर चीनविरोधात 245 टक्के आयात शुल्क लावले आहे. शिवाय नव्वद दिवसात जर विविध देशाबरोबर बोलणी यशस्वी झाली नाही तर इतर देशाविरोधातही अमेरिका आयात शुल्क लावणार आहे. या घडामोडीचा जागतिक व्यापारावर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत 2025 मध्ये जागतिक व्यापार 0.2% कमी होण्याची शक्यता असल्याचे जागतिक व्यापार संघटनेने नमूद केले आहे.
जर पुढील 90 दिवसांमध्ये अमेरिकेची विविध देशाबरोबर बोलणी यशस्वी झाली नाही आणि विविध देशानी परस्पराविरोधात आयात शुल्क लावले तर जागतिक व्यापारावर त्यापेक्षा जास्त म्हणजे 1.5% चा परिणाम होऊ शकतो असा इशारा या संघटनेने दिला आहे. यामुळे निर्यातीवर अवलंबून असलेल्या विकसनशील देशांना जास्त त्रास होणार असल्याचेही या संघटनेने नमूद केले.
वस्तूच्या निर्यातीवर परिणाम तर होणार आहेस त्याचबरोबर यामुळे निर्माण झालेल्या नकारात्मक वातावरणामुळे सेवा क्षेत्राच्या निर्यातीवर परिणाम होणार आहे. भारताची सेवा क्षेत्राची निर्यात वस्तूच्या निर्यातीपेक्षा जास्त आहे. हा परिणाम कमी होऊ व्हावा यासाठी भारताने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
भारताने निर्यातीच्या आघाडीवर चांगली कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी भारताची निर्यात वाढून 820 अब्ज डॉलर या विक्रमी पातळीवर गेली होती. मात्र त्यानंतर निर्यात मंदावू लागली होती. पुन्हा मार्च महिन्यामध्ये भारताचे निर्यात 0.7% वाढून 41.97 अब्ज डॉलरवर गेले आहे.
भारताच्या उद्दिष्टपूर्तीत अडथळे
अमेरीकेने सुरू केलेल्या व्यापार युद्धाचा भारतालाही परिणाम भोगाव लागणार आहे. भारताने गेल्या दहा वर्षापासून निर्यात वाढविण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केला आहे. 2030 पर्यंत निर्यात दोन लाख कोटी डॉलरपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. मात्र डोनाल्ह ट्रम्प यांनी सुरू केलेल्या व्यापार वृद्धामुळे भारताला हे ध्येय साध्य करण्यासाठी बराच प्रयत्न करावा लागू शकतो. किंबहुना हे ध्येय साध्य होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
00000000
अमेरिकेला निर्यात करण्याची घाई
90 दिवसात जास्तीत जास्त निर्यात करण्याचा प्रयत्न
मुंबई – अमेरिकेने भारताविरोधात 26 टक्के आयात शुरू कर लावण्याची घोषणा केलेली आहे. मात्र त्यानंतर आपल्या घिसडघाईच्या निर्णयाची उपरती झाल्यानंतर अमेरिकेने या शुल्क अंमलबजावणीला 90 दिवसाची स्थगिती दिली आहे. अमेरिकेचे अस्थिर व्यापार धोरण पाहता या 90 दिवसात जास्तीत जास्त प्रमाणात निर्यात करण्याचा भारतातील निर्यातदाराचा प्रयत्न चालू आहे.
हिरे, दागिने, पादत्राणे आणि तयार कपड्याच्या निर्यातदारांनी यासाठी कंबर कसली असून या कालावधीत शक्यतो जास्तीत जास्त निर्यात करण्यासाठी अमेरिकन आयातदराबरोबर चर्चा चालू आहे. अमेरिकेतील आयात करणार्या कंपन्याही भारताच्या कंपन्यांना चांगला प्रतिसाद देत असून या 90 दिवसांमध्ये अमेरिकेला विक्रमी निर्यात होण्याची शक्यता आहे.
दरम्यानच्या काळात अमेरिकेबरोबर भारताची व्यापार बोलणी चालू आहे. मात्र ट्रम्प यांचा स्वभाव पाहता ही बोलणी यशस्वी होईल किंवा नाही याबाबत कोणीही ठाम अंदाज बांधू शकत नाही. अशा परिस्थितीत आम्ही शक्य तितकी जास्त निर्यात या स्थगितीच्या काळात करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निर्यातदारांनी सांगितले. त्याचबरोबर अमेरिकेने चीनविरोधात 245 टक्क्याचे आयात शुरूक लावले. अशा परिस्थितीत चीनमधून वस्तू अमेरिकेत जाणार नाहीत.
याचाही फायदा घेण्याचा प्रयत्न भारताचे निर्यातदार करत आहेत. त्यामुळे या निर्यातदारांनी आपल्या उत्पादकांना जास्तीत जास्त उत्पादन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. चीनची बाजारपेठ भारतीयाला मिळणार असल्यामुळे भारताने जास्तीत जास्त प्रयत्न करण्याची गरज आहे. यामध्ये वेगवान उत्पादन आणि वेगात पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. या कामी निर्यातदारांना वित्त पुरवठा करणे, मालाची वाहतूक वेगात होईल याची व्यवस्था करणे, इत्यादी बाबी सरकारला कराव्या लागणार आहेत. त्याचबरोबर यासंदर्भातील परवानग्यासाठी वेळ लागणार नाही याची खबरदारी घ्यावी लागणार आहे.
सरकारने निर्यातदारांना मदत करावी
या 90 दिवसात जास्त उत्पादन घेता यावे यासाठी केंद्र सरकारने संबंधित उत्पादकांना आवश्यक ती मदत करण्याची गरज आहे. कारण अशी संधी पुन्हा मिळणार नाही असे निर्यातदारांच्या संघटनेचे अध्यक्ष एस सी रल्लन यांनी सांगितले. चीन अमेरिकेला मुख्यतः इलेक्ट्रॉनिक वस्तू, कॉम्प्युटर, मशीनचे भाग, इलेक्ट्रिक बॅटरी, हिटर, खेळणी, फर्निचर, कपडे आणि पादत्राणे निर्यात करतो, या उत्पादनाची भारताकडे मागणी वाढण्याची शक्यता आहे.
000000000
मार्च महिन्यात सोन्याची आयात वाढली
गुंतवणूकदारांकडून सोन्याची मागणी वाढत असल्याचा परिणाम
मुंबई – सोन्याचे दर सध्या विक्रमी पातळीवर आहेत. मात्र तरीही मार्च महिन्यात भारताची सोन्याची आयात तब्बल 192 टक्क्यांनी वाढून 4.47 अब्ज डॉलर या पातळीवर गेली आहे. सोन्याची आयात वाढल्यानंतर भारताची व्यापारातील तूट वाढून त्याचा परिणाम रुपयाच्या मूल्यावर होत असतो.
मात्र दागिने उत्पादकांबरोबरच गुंतवणूकदारांनी सोन्याची मागणी वाढविल्यामुळे ही वाढ झाली असल्याचे दिसून येते. सोन्याची आयात वाढू नये, म्हणून सरकार प्रयत्न करत असतानाच मागणी वाढल्यामुळे विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. एकूणच मागणी वाढली असल्यामुळे एप्रिल ते मार्च 2024-25 या कालावधीत भारताची सोन्याची आयात 27% वाढून 58 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. गेल्या वर्षी या कालावधीत 45.54 अब्ज डॉलरच्या सोन्याचे आयात झाली होती.
17 एप्रिल रोजी सोन्याचा दर 70 रुपयांनी वाढून 98,170 रुपये प्रति 10 ग्रॅम या विक्रमी पातळीवर गेला. डॉलर कमकुवत होत असल्यामुळे आणि शेअर बाजारातील गुंतवणूक अस्थिर झाल्यामुळे सोन्याची मागणी वाढून सोन्याचे दर वाढत आहेत. मात्र यामुळे भारताला सोन्यासाठी जास्त डॉलर मोजावे लागत आहेत.
एकूण आयातीत सोन्याचे प्रमाणात 8% वर गेले आहे. भारताने आपल्या गरजेच्या 40% सोने स्वित्झर्लंडमधून, 16% सोने संयुक्त अरब अमिरातीमधून, दहा टक्के सोने दक्षिण आफ्रिकेकडून खरेदी केले. सोन्याच्या वाढलेल्या आयातीमुळे भारताची व्यापारातील तूट मार्च महिन्यात 21.54 अब्ज डॉलरवर गेली आहे. त्याचबरोबर सरलेल्या वर्षात भारताची व्यापार तूट 282.82 अब्ज डॉलर या विक्रमी पातळीवर गेली आहे. भारत हा जगातील सोने आयात करणारा सर्वात मोठा दुसरा देश आहे.
आयात वाढीचे कारण काय
व्यापार युद्धामुळे विविध बाजारावर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचे आकर्षण वाढले आहे. वैयक्तिक गुंतवणूकदाराबरोबरच रिझर्व बँका याच कारणामुळे सोने खरेदी वाढवीत आहेत. त्यामुळे सोन्याचे दर जास्त असूनही आयात वाढली आहे. शिवाय गुंतवणूकदारांना शेअरपेक्षा इतर वेगळ्या गुंतवणूक साधनात गुंतवणूक करण्याची इच्छा असल्याचे व्यापार्यांनी सांगितले.
000000000
केवळ चार दिवसात सहा टक्के वाढ
स्थूल अर्थव्यवस्था बळकट असल्यामुळे शेअर निर्देशांक वाढले
मुंबई – जागतिक शेअर बाजारात अमेरिकेने सुरू केलेल्या व्यापार युद्धामुळे कमालीची अनश्चितता निर्माण झाली आहे. मात्र भारतीय शेअर बाजार निर्देशांक गेल्या चार दिवसात तब्बल सहा टक्क्यांनी वाढले. यामुळे गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे मूल्य या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे दिसून येते.
अमेरिकेने भारताविरुद्ध लावलेले 26 टक्के आयात शुल्क 90 दिवसांसाठी स्थगित केल्यानंतर शेअर बाजारात खरेदी वाढली. त्याचबरोबर भारतात यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे. भारतीय अर्थव्यवस्था पावसावर बरीच अवलंबून असते. त्यामुळे ग्रामीण भागातील क्रयशक्ती वाढते. हे कारण गुंतवणूकदारांना आकर्षित करीत होते.
अमेरिकेच्या व्यापार धोरणामुळे अमेरिकेत मंदी निर्माण होण्याची शक्यता वाढल्यामुळे अमेरिकेचा डॉलर या पंधरा दिवसात कमकुवत होऊन दोन वर्षाच्या निचांंकी पातळीवर गेला. यामुळे रुपयाचे मूल्य वाढण्यास मदत झाली. अशा परिस्थितीत भारतात केलेली गुंतवणूक परदेशी गुंतवणूकदारांना नफादायक ठरणार असल्यामुळे या गुंतवणूकदारांनी या कालावधीत भारतात गुंतवणूक केली.
महागाई कमी पातळीवर
किरकोळ महागाई सहा महिन्याच्या निचांंकावर आहे. त्यातच पाऊस चांगला पडल्यामुळे ही महागाई नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे .त्याचबरोबर घाऊक महागाई कमी झाली आहे. यामुळे गुंतवणूकदार सुखावले आहेत. अशा परिस्थितीत रिझर्व बँक निश्चितपणे आगामी काळात व्याजदर कपात मोहीम चालू ठेवण्याची शक्यता असल्यामुळे खरेदी वाढलीे.
रुपया घसरत असल्यामुळे आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदार विक्री करीत होते. मात्र रुपया बळकट झाल्यामुळे या चार दिवसात परदेशी संस्थागत गुंतवणूकदारानी तब्बल एक अब्ज डॉलरच्या शेअरची म्हणजे 8,000 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली आहे. त्यामुळे निर्देशांकांना चांगलाच आधार मिळाला आहे. शिवाय नऊ एप्रिल रोजी रिझर्व बँकेने व्याजदरात पुन्हा 0.25 टक्क्यांची कपात केली आणि आगामी काळातही कपात करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
25.77 लाख कोटी रुपयांचा फायदा
सरलेल्या कामकाजाच्या चार दिवसांमध्ये मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 4,706 अंकांनी म्हणजे 6.37 % तर निफ्टी 1,452 अंकांनी म्हणजे 6.48 % वाढला. यामुळे शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य तब्बल 25.77 लाख कोटी रुपयांनी वाढून 419 लाख कोटी रुपये म्हणजे 4.90 लाख कोटी डॉलरवर गेले आहे.
0000000
सरकारकडून 3.40 लाख टन तुर डाळीची खरेदी
नवी दिल्ली – केंद्र सरकारने आतापर्यंत शेतकर्याकडून किमान हमी दरानुसार 3.40 लाख टन तूर डाळीची खरेदी केली आहे. यामुळे भारतातील शेतकर्यांना चांगला भाव मिळण्यास मदत झाली आहे. शेतकर्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात तुरडाळीचे उत्पादन करावे यासाठी केंद्र सरकार मदत करत आहे.
यामुळे तूर डाळीची आणि इतर डाळीची आयात कमी होण्यास मदत होईल असा यामागे सरकारचा दृष्टिकोन आहे. भारतात नऊ राज्यांमध्ये तूरीचे बर्याच प्रमाणात पीक घेतले जाते. या राज्यातून यावर्षी 20 लाख टन तुर डाळीची खरेदी करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठरविले आहे. या खरेदी केलेल्या डाळीतून केंद्र सरकार 10 लाख टनाचा साठा राखीव म्हणून ठेवणार आहे. त्यामुळे तूर डाळीची आवश्यकता पडल्यानंतर हा साठा खुल्या बाजारात उपलब्ध करणे अपेक्षित आहे.
कर्नाटक राज्यातून सर्वात जास्त तूर डाळ खरेदी झाली आहे. या राज्यातून 1.3 लाख टन तूर डाळ खरेदी करण्यात आली. तूर डाळीला केंद्र सरकारने 7,550 रुपयाचा भाव जाहीर केला. त्याचबरोबर कर्नाटक सरकारने अतिरिक्त 450 रुपये शेतकर्यांना प्रति टन द्यायचे ठरविले आहे.
आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेशातही तूर डाळीची खरेदी चालू आहे. केंद्र सरकारने तेलंगणा आणि मध्य प्रदेशातून 17,000 टन चना डाळ खरेदी केली आहे. केंद्र सरकारने 27 लाख टन चना डाळ खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठरविले होते. मात्र सध्या भारतीय बाजारपेठेत चणाडाळीचा भाव 5,650 रुपये या हमी भावापेक्षा जास्त असल्यामुळे या कृषी उत्पादनाची पुरेशी खरेदी झालेली नाही. या डाळीच्या निर्यातीवर दहा टक्के निर्यात शुल्क लावण्यात आले आहे. मसूर डाळीची खरेदी 2,875 आणि मूग डाळीचे खरेदी तीन हजार टन इतकी झाली आहे.
00000000
व्होेडाफोन आयडियाच्या कामकाजावर परिणाम
मुंबई – व्होेडाफोन आयडिया कंपनीच्या कामकाजावर शुक्रवारी सकाळी बराच परिणाम झाला होता. त्यामुळे या कंपनीची मोबाईल सेवा वापरणार्या ग्राहकांनी बर्याच तक्रारी केल्या. काही तांत्रिक कारणामुळे या सेवेवर परिणाम झाला होता. आता हा प्रश्न मिटविण्यात आला आहे असे कंपनीने सांगितले आहे.सध्या वोडाफोन आयडिया कंपनीच्या सेवा सुरळीत चालू असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
कंपनीच्या प्रवक्तयाने सांगितले की, दिल्ली लगतच्या भागांमध्ये तांत्रिक कारणामुळे शुक्रवारी सकाळी कामकाजावर परिणाम झाला होता. मात्र तक्रारी आल्यानंतर कंपनीने लगेच उपाययोजना करून हा तांत्रिक बिघाड दुरुस्त केला.
त्यामुळे आता कामकाजावर कसलाही परिणाम झालेला नाही. सकाळी साडेबारा वाजल्यानंतर ग्राहकानी तक्रारी करण्यास सुरुवात केली. एक वाजेपर्यंत या तक्रारी चालू होत्या. सिग्नल उपलब्ध नव्हते अशा तक्रारी काही ग्राहकांनी केल्या तर पूर्ण ब्लॅकआऊट झाले असल्याचे काही ग्राहकांनी सांगितले.
—————-





