Eco Friendly Wedding – विवाह सोहळ्यात सप्तपदीला अनन्यसाधारण महत्व आहे. या सप्तपदीसोबत पर्यावऱण रक्षणासाठी शहरातील हृषिकेश मापारी आणि वैदेही पतकी यांनी आठ पर्यावरणपूरक उपक्रमांचा संकल्प केला. अलीकडे पर्यावरणचा ऱ्हास ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यासाठी जनजागृतीच्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने पुढे येणे आवश्यक आहे. हाच संदेश या अनोख्या विवाह सोहळ्यातून देण्यात आला. शहरातील हृषिकेश आणि वैदेही यांचा नुकताच विवाह सोहळा झाला. यामध्ये त्यांनी प्लास्टिकचा वापर कमी करत पर्यावरण संवर्धनावर विषेश भर दिला. सुमारे आठशे पै-पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी सप्तपदीसोबतच पर्यावरण रक्षणासाठी आठ हरित संकल्प करत विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये पाण्यासाठी स्टीलच्या बाटल्या व ग्लास, जेवणासाठी मेलामाईन प्लेट्स, स्टील चमचे आणि काचेचे ग्लास वापरण्यात आले. तसेच प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्या वापरून एकदाच वापरल्या जाणाऱ्या वस्तूंना पूर्णपणे फाटा देण्यात आला. कार्यक्रमामध्ये ओला व सुका कचरा वेगळा संकलित करून योग्य पद्धतीने व्यवस्थापन करण्यात आले. कचरा वेगळा ठेवण्यासाठी समारंभाच्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी मार्गदर्शक फलक (बोर्ड) लावण्यात आले होते. तसेच कार्यक्रमानंतर अन्नकचऱ्याचे कंपोस्टमध्ये रूपांतर करण्याची व्यवस्था करण्यात आली. अन्न वाया जाऊ नये यासाठी पाहुण्यांना आवश्यक तेवढेच अन्न घेण्याचे आवाहन करण्यात आले. विशेष म्हणजे, लग्नाआधीच्या सर्व कार्यक्रमांमध्येही मापारी कुटुंबाने स्टीलच्या भांड्यांचा वापर केला. तसेच पाहुण्यांच्या राहण्याच्या ठिकाणी प्रत्येक खोलीत स्टील पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्लास्टिक पाण्याच्या बाटल्यांचा वापर पूर्णपणे टाळण्यात आला. आजच्या युवक-युवतींनी विवाहासारख्या मोठ्या सामाजिक कार्यक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणे ही समाजासाठी प्रेरणादायी बाब आहे. हा उपक्रम केवळ लग्नातील व्यवस्था नसून भावी आयुष्यासाठीचा पर्यावरण जपण्याचा संकल्प असल्याचे या उपक्रमातून दिसून आले. या संपूर्ण संकल्पनेचे नियोजन सावरकर मंडळाचे श्रीकांत मापारी, धनंजय शेडबाळे, भास्कर रिकामे तसेच इको इव्हेंट्स इंडिया यांच्या रेश्मा बोरा आणि गणेश बोरा यांनी केले. छोट्या बदलांमुळे मोठा परिणाम होऊ शकतो हा संदेश देत या युवा दाम्पत्याने समाजाला की वसुंधरेला कचरामुक्त ठेवण्यासाठी प्रत्येकाने कृतीतून पुढे यावे असे आवाहन केले आहे. केवळ कायदे करून नव्हे तर मनापासून पर्यावरण जपण्याची भावना असेल तरच आपली सुंदर वसुंधरा हरित आणि स्वच्छ राहू शकते असे मत यावेळी नवदाम्पत्याने व्यक्त केले.