“याआधी देशात लोकशाही होती, पण आता हुकूमशाही आहे”; राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराचे पडसाद बुधवारीदेखील उमटत आहेत. प्रियंका गांधींना अटक केल्याने काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक असताना राहुल गांधी यांनीदेखील घटनास्थळी जाण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच चिघळण्याची मार्गावर असल्याचे दिसत आहे.
राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश सरकारने परवानगी नाकारली आहे. दरम्यान लखनऊला जाण्याआधी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार टीका केली. भारतात आधी लोकशाही होती, आता हुकूमशाही आहे अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.
“याआधी देशात लोकशाही होती, पण आता हुकूमशाही आहे. राजकारणी उत्तर प्रदेशला जाऊ शकत नाहीत. आम्हाला कालपासून तुम्ही उत्तर प्रदेशला जाऊ शकत नाही असं सांगितलं जात आहे,” असे राहुल गांधींनी यावेळी सांगितले. राहुल गांधी यांनी यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यासोबत लखीमपूर खेरी येथे जाणार असल्याचे सांगितले. लखीमपूर खेरी येथे १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. यामुळे राहुल गांधी यांनी तिघेच जाणार असल्याचे म्हटले.
LIVE: लखीमपुर खेरी में हुए नरसंहार व कांग्रेस नेताओं के साथ अन्याय पर प्रेस के साथियों से मेरी वार्ता। https://t.co/oUC4OA2bKf
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 6, 2021
“काही दिवसांपासून भारतातल्या शेतकऱ्यांवर सरकार आक्रमण करत आहे. शेतकऱ्यांना जीपखाली चिरडले जात आहे. त्यांची हत्या केली जात आहे. राज्य गृहमंत्र्यांच्या मुलावर कोणतीही कारवाई केली गेली नाही. दुसरीकडे पद्धतशीरपणे शेतकऱ्यांवर हल्ले केले जात आहेत. जमीन संपादन कायदा, शेतकरी कायदे आणि आता हे आंदोलन शेतकऱ्यांकडून काढून घेतले जात आहेत. ही चोरी सर्वांसमोर होत आहे. यामुळे देशातील शेतकरी दिल्लीच्या बाहेर बसले आहेत. काल पंतप्रधान लखनऊमध्ये होते पण लखीमपूर खेरी येथे गेले नाहीत. शवविच्छेदन पण नीट केले गेलेले नाही. दोन मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी लखीमपूर खेरी येथे जाण्याचा प्रयत्न करणार आहे,” असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे.
“उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांना मारले जात आहे. हाथरसमध्ये ही अत्याचार झाला. त्यांच्या एका आमदारानेही बलात्कार केला होता. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये नव्या प्रकारचे राजकारण होत आहे. आरोपी उत्तर प्रदेशात काहीही करु शकतात. बलात्कार, शेतकऱ्यांना मारणे सुरु आहे. जे मारतात ते जेलच्या बाहेर असतात आणि जे मरतात ते आतमध्ये जातात,” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
“उत्तर प्रदेशात फक्त काँग्रेसला थांबवलं जात आहे आणि बाकीच्या पक्षांना सोडण्यात आलं आहे. आम्ही काय चूक केली आहे. विरोधकाचं काम सरकारवर दबाव टाकण्याचं असतं. जेव्हा आम्ही दबाव टाकतो तेव्हा कारवाई होते. हाथरसमध्ये आम्ही दबाव टाकला तेव्हा कारवाई झाली. सरकारला वाटतं की आम्ही मुद्दा लावून धरू नये. हाथरसमध्ये आम्ही गेलो नसतो तर आरोपी पळून गेले असते. म्हणून आम्ही दबाव टाकत आहोत. शेतकऱ्यांवर हल्ला केला जात आहे म्हणून आम्ही दबाव टाकत आहोत. हे तुमचं काम आहे पण तुम्ही करत नाही आहात. उलट आम्हाला प्रश्न विचारले जात आहेत,” असे राहुल गांधी यांनी म्हटले.





