E-Challan Protest – वाहतूक संघटनाच्या प्रलंबित मागण्या आणि ई-चलन प्रणालीतील जाचक अटींच्या विरोधात गुरुवारी (दि. ५) पुणे शहरातील रिक्षा, टॅक्सी, बस आणि ट्रक संघटनांनी एकत्र येत राज्य सरकारविरुद्ध एल्गार पुकारला. आरटीओ कार्यालय (संगम पूल) आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले. मागण्यांवर निर्णय न झाल्यास उद्यापासून हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनांनी दिला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व वाहतूक संघटनांकडून बुधवारी (दि. ४) हाॅर्न वाजवून आंदोलन केले. गुरुवारी सकाळी बस, रिक्षा, टॅक्सी या संघटनांनी वाहने रस्त्यावर आणून सारसबाग येथून आंदोलनाला सुरुवात केली. या वेळी प्रशासनाच्या धोरणांचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. काही सभासद मुंबईतील आझाद मैदानावर होणार्या आंदोलनासाठी रवाना झाले होते. या आंदोलनात डॉ. बाबा शिंदे, राजन जुनावणे, किरण देसाई, दत्ता भेगडे, बाळासाहेब बोराटे, दीपक कलापुरे, रिक्षा संघटनेचे नितीन पवार, डॉ. केशव क्षीरसागर, दत्ता घुले, बापू भावे, प्रदीप भालेराव, आबा बाबर, अशोक साळेकर यांचा समावेश होता, तसेच राजू खेडेकर यांनीही आपल्या सहकार्यांसह सहभाग घेतला. उद्यापासून शालेय विद्यार्थी वाहतूक आणि कंपन्यांची कर्मचारी वाहतूक करणार्या स्टाफ बसेसही आंदोलनात सामील होणार असून, सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास शहराचा धान्य आणि भाजीपाला पुरवठा करणारी वाहतूक सेवाही बंद करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. आंदोलन तात्पुरते स्थगित पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून वाहतूक संघटनांच्या गाड्या संचेती चौकात आल्या. त्यामुळे कोंडी झाली. पिंपरीवरून येणाऱ्या गाड्या पोलिसांनी काही वेळासाठी थांबविल्या, तसेच आंदोलन मार्गावर पोलिसांनी बंदोबस्त ठेवून वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला. आरटीओ कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी निवेदन स्वीकारले. तेथून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचला. तेथे निवेदन दिल्यावर घोषणाबाजी करत आंदोलन तात्पुरते स्थगित केले.