Madhavi Lata : पुलाच्या निर्मितीचे श्रेय घेण्यास डॉ. माधवी लतांनी दिला नकार

श्रीनगर : जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाच्या बांधकामासाठी लोक सोशल मीडियावर अभियंता डॉ. माधवी लता यांचे अभिनंदन करत आहेत. आता त्यांनी यासंदर्भात एक लिंक्डइन पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, चिनाब पुलाच्या बांधकामाचे श्रेय मला देऊ नका. त्याच्या नियोजन, डिझाइन आणि बांधकामाचे सर्व श्रेय भारतीय रेल्वे आणि एफकॉन इफ्रास्ट्रक्चरला जाते.
यामध्ये माझी भूमिका एका भू-तंत्रज्ञानी व्यक्तीची होती, ज्याचे काम उतारावरील पायाच्या डिझाइनवर काम करणे होते. लता पुढे म्हणाल्या, मला विनाकारण प्रसिद्ध करू नये. कारण हे एका व्यक्तीचे नाही तर हजारो लोकांच्या सामूहिक परिश्रमाचे फळ आहे. या मोहिमेमागे महिलेचा हात होता, अशक्य ते शक्य झाले आणि पूल बांधण्यासाठी चमत्कार झाला असे माध्यमांमधील सर्व विधाने निराधार आहेत.
खरं तर, उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्यासह हजारो लोकांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून माधवी लता यांचे कौतुक केले होते. पुलाच्या प्रकल्पासाठी १७ वर्षे समर्पित केल्याबद्दल लोक त्यांचे अभिनंदन करत होते.





