Pimpri-Chinchwad: खेचर बनू नका, कमिशनच्या मोहात पडू नका; ‘म्युल अकाउंट’मुळे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते!
Pimpri-Chinchwad: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात ५८ गुन्ह्यांची नोंद; बँक खाते वापरायला दिल्यास थेट गुन्हेगार ठरण्याचा इशारा

पिंपरी – सध्या शहरात म्युल अकाउंट प्रकरणी मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल होत आहेत. म्युल म्हणजे ओझे वाहणारे खेचर…ज्यांचा सायबर गुन्हेगारीशी थेट संबंध नसतो फक्त फसवणुकीचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होतात आणि काढले जातात, यासाठी त्यांचा वापर होतो म्हणजे त्यांच्या खात्याला म्युल अकांउट अर्थात खेचराचे खाते म्हटले जाते. काहीही न करता फुकट पैसे मिळविण्याच्या नादात अनेकजण आपली खाती सायबर गुन्हेगारांना देतात. अशा म्युल अकाउंटधारकांवर सध्या कडक कारवाई केली जात आहे.
“तुमचे बँक खाते भाड्याने द्या, दरमहा हजारो रुपये कमवा”, “खाते वापरायला दिल्यास कमिशन मिळेल” अशा आमिषांना बळी पडणाऱ्यांची संख्या वाढत असून, अशा प्रकारे वापरली जाणारी ‘म्युल अकाउंट’ ही सायबर गुन्हेगारांची मोठी शक्कल ठरत आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अशा म्युल अकाउंटशी संबंधित ५८ गुन्ह्यांची नोंद झाली असून, सायबर पोलिसांनी नागरिकांना विशेष सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सायबर गुन्हेगार ऑनलाइन फसवणुकीतून मिळालेली रक्कम थेट स्वतःच्या खात्यात जमा न करता इतरांच्या बँक खात्यांचा वापर करतात. या खात्यांना ‘म्युल अकाउंट’ म्हटले जाते. त्यामुळे मूळ गुन्हेगारापर्यंत पोहोचणे कठीण होते आणि तपासाची सुई खातेदाराकडे वळते. अनेक नागरिक काही हजार रुपयांच्या कमिशनच्या मोहापोटी स्वतःचे बँक खाते, एटीएम कार्ड, पासबुक किंवा यूपीआय सुविधा गुन्हेगारांच्या ताब्यात देतात. काही वेळा आधार, पॅनसारख्या कागदपत्रांचा गैरवापर करून बनावट खातीही उघडली जातात.
सायबर तज्ज्ञांच्या मते, फसवणुकीची रक्कम प्रथम म्युल अकाउंटमध्ये जमा केली जाते. त्यानंतर ती रोख स्वरूपात काढली जाते किंवा वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळवली जाते. त्यामुळे आर्थिक व्यवहारांचा माग काढणे अधिक गुंतागुंतीचे होते. मात्र, बँक खाते संबंधित व्यक्तीच्या नावावर असल्याने कायद्याच्या दृष्टीने खातेदारालाच या गुन्ह्याचा सहआरोपी मानले जाते.
पोलिसांच्या माहितीनुसार, अशा प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करून संबंधित खातेदाराला अटक केली जाऊ शकते. तपासादरम्यान संबंधित व्यक्तीची सर्व बँक खाती गोठविली जातात. पासबुक, एटीएम कार्ड, धनादेश पुस्तिका, मोबाइल फोन आणि डिजिटल पुरावे जप्त केले जातात. सायबर फसवणुकीतील रक्कम परत मिळविण्यासाठी खात्यातील पैसे जप्त केले जातात. तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले जाते. गुन्हा सिद्ध झाल्यास दंडासह तीन ते सात वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.
याशिवाय अशा गुन्ह्यांमुळे संबंधित व्यक्तीच्या बँकिंग व्यवहारांवर परिणाम होतो. भविष्यात नवीन खाते उघडणे, कर्ज मिळविणे, शासकीय नोकरीसाठी पोलीस पडताळणी किंवा पासपोर्ट मिळविताना अडचणी निर्माण होऊ शकतात.
सायबर पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत आपले बँक खाते, एटीएम कार्ड, धनादेश पुस्तिका, यूपीआय संकेतांक किंवा एकवेळचा संकेतांक (ओटीपी) अनोळखी व्यक्तीला देऊ नये, असे आवाहन केले आहे. बँक खात्यात संशयास्पद व्यवहार आढळल्यास तातडीने बँक आणि सायबर पोलिसांशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
‘सायबर गुन्हेगारांचे आमिष क्षणिक असले, तरी त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागू शकतात. त्यामुळे “सोपे पैसे” कमावण्याच्या मोहापासून दूर राहणे, हाच अशा गुन्ह्यांपासून बचावाचा सर्वात प्रभावी मार्ग असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
‘म्युल अकाउंटबाबत यादी प्राप्त झाली आहे. पिनकोडनुसार बँकेकडे माहिती मागविण्यात येत आहे. माहिती प्राप्त झाल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. नागरिकांनी आपले बँक खाते इतरांना वापरण्यास देऊ नये.’ – रविकिरण नाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे
म्युल अकाउंटबाबत घ्यावयाची काळजी:
– आपले बँक खाते कोणालाही विकू नका.
– कोणाच्याही आमिषाला किंवा कमिशनला भुलू नका.
– एटीएम कार्ड आणि पासवर्ड गुप्त ठेवा.
– अनोळखी व्यक्तीला बँक पासबुक देऊ नका.
– ओटीपी (OTP) कोणासोबतही शेअर करू नका.
– स्वतःच्या खात्यावर संशयास्पद व्यवहार टाळा.
– इतर कोणाचे पैसे खात्यावर मागवू नका.
– तुमचे आधार आणि पॅन कार्ड सुरक्षित ठेवा.
– संशयास्पद व्यवहारांची माहिती बँकेला तात्काळ द्या.
– तात्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवा.
PMPML: महापालिकेच्या ३२ जागांवर पीएमपीचा दावा! आयुक्त नवल किशोर राम तयार करणार अहवाल





