शिक्षकांच्या बलिदानाची वाट पाहताय का?

पुणे – विना अनुदानित शाळेत गेली 15 ते 16 वर्षे विनावेतन व गेल्या दोन-तीन वर्षांपासून 20 टक्के वेतनावर हजारो शिक्षक काम करत आहेत. त्यांची हेळसांड सुरूच असून शिक्षणमंत्री वारंवार तारखा देत आहेत. यावर शिक्षक हतबल झाले असून आता शिक्षकांच्या बलिदानाची वाट पाहत आहे का? असा सवाल कायम विना अनुदानित शिक्षक संघटनेचे शहराध्यक्ष सुनील पानसरे यांनी उपस्थित केला आहे.
राज्य सरकार व शिक्षण विभाग यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी शहरातील सर्व अंशतः अनुदानित शाळा बंद ठेवत शिक्षकांनी आंदोलन केले. राज्यातील 1,628 शाळा व तुकड्यांना 2016 साली 100 टक्के अनुदान मंजूर होत असताना राज्यसरकारने 20 टक्के अनुदानावर बोळवण केली. त्यानंतर आंदोलने झाले. सरकारने शिक्षणमंत्री, अर्थमंत्री यांची उपसमिती नेमली. त्यांचाअहवाल आल्यानंतर प्रचलीत धोरणानुसार अनुदान देण्याचे आश्वासन दिले. मात्र, ते अजून पूर्ण केले नसल्याचे सांगण्यात आले.





