Diwali Pahat : गौतमी पाटीलनं गाजवली ठाणेकरांची दिवाळी… जितेंद्र आव्हाड आणि सुषमा अंधारेंनी शिंदे गटाला झापलं !

Diwali Pahat – दिवाळी पहाट निमित्त (Diwali Pahat) ठाण्यात (Thane) झालेल्या एका कार्यक्रमावरुन सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. सबके कातिल, गौतमी पाटील म्हणून प्रसिद्ध झालेल्या लावणी डान्सर गौतमी पाटीलने (Gautami Patil Dance) दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला ठाण्यात हजेरी लावली होती. खास दिवाळी पहाटनिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला होता.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने आदल्या दिवसापासून त्याची चर्चा सुरु होती. ठाण्याच्या तलावपाळीजवळील कार्यक्रमात सकाळीच लावणीच्या गाण्यावर गौतमीसह तिथं आलेली तरुणाई थिरकली. ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
मात्र आता या कार्यक्रमावरुन महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले असून, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि वाद हे सध्या एक समीकरण झालं आहे. आणि असच काहीसं आता राज्याच्या राजकारणात देखील दिसून आलं आहे.
या कार्यक्रमावरुन शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता शिवसेना शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. गौतमीच्या लावणी नृत्याने महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लागल्याचं नेतेमंडळींनी म्हटलं आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की… “महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा दिवाळी पहाट लावणीने साजरी केली गेली. संस्कृती बदललीये….. ठाणे स्मार्ट नाही ओवर स्मार्ट झालंय” अशा शेलक्या शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे गटावर टीका केलीये.
तर दुसरीकडे बोलताना सुषमा अंधारे म्हणल्या, “आतापर्यंत दिवाळी पहाटनिमित्त आम्ही पंडीत बिस्मिल्ला साहेबांची सनई, पंडीत भीमसेन जोशी यांची भक्तीगीते किंवा पद्मजा फेणानी यांचा गोड गळा… हे सगळं ऐकत होतो. आज ठाण्यामध्ये उजाडलेली दिवाळी पहाट ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनाच काय, अवघ्या महाराष्ट्रालाही अपेक्षित नसेल” अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.





