मुंबई – अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाच्या मागणीवरून शिवसेना युतीतून बाहेर पडली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेससोबत हातमिळवणी करत महाविकास आघाडीच्या प्रयोगाखाली सत्तास्थापन करत मुख्यमंत्री पद मिळवले. यानंतर आक्रमक झालेल्या भाजपने शिवसेनेला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली घेरण्याचा प्रयत्न केला. यानंतर दोन्ही पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले. शिवसेनेच्या काही मंत्र्यांची इडीमार्फत चौकशीही सुरू आहे. यात भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेकडून संजय राऊत हे पत्रकार परिषद घेत भ्रष्टाचाराची नवनवीन प्रकरणे बाहेर काढत आहेत. यादरम्यान, त्यांच्याकडून पातळी सोडून काही वक्तव्येही करण्यात येत आहेत.
गुरुवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली. त्यानंतर सोमय्या यांनी केलेल्या ट्विटमध्ये माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा माफिया म्हणून उल्लेख केला होता. यावर नाराजी व्यक्त करत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसकर आणि आमदार संजय गायकवाड यांनी समाचार घेतला आहे.
बुलढाण्याचे शिवसेना आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले की, ”किरीट सोमय्यांनी असं काही समजू नये की आता शिवसेना संपली, ही तीच शिवसेना आहे व आम्ही सत्तेत भाजप – शिवसेना युती म्हणून काम करतोय, आम्ही बाहेर पडलो याचा अर्थ बाळासाहेब, उद्धव साहेबांबद्दल आमची श्रद्धा नाही, असा समज किरीट सोमय्यांनी करून घेऊ नये. यापुढे त्यांनी असे वक्तव्य करू नये, अन्यथा आम्हाला सत्तेची पर्वा नाही”, असा इशाराच आमदार गायकवाड यांनी दिला आहे.
शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर म्हणाले की, ”उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असा शब्द वापरणे आम्हाला मान्य नाही. अशा शब्दांचा वापर केला जाऊ नये. आम्ही जेव्हा मुंबईत आलो त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदार आणि भाजपच्या नेत्यांची बैठक झाली. ज्याला देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. त्या बैठकीत मला बोलण्याची संधी मिळाल्यावर मी विनंती केली होती की, आमचे नेते उद्धव ठाकरे किंवा कोणत्याही अन्य नेत्यांच्या बाबतीत वक्तव्य करण्यात येऊ नये. त्यांनी ती विनंती मान्य केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः भाजप कार्यकर्त्यांना आपल्या भाषणातून सांगितलं होतं की, जे ज्येष्ठ नेते असतात, त्यांच्याशी राजकीय वाद होऊ शकतो. परंतु कोणीही त्यांच्याबद्दल काहीही वक्तव्य करू नये. असं त्यांनी स्पष्ट सागितलं होतं. त्यानंतर आज जे घडलं त्याबद्दल आमचं जे ठरलं होतं ते आम्ही फडणवीस यांना सांगू. सोमय्या हे भाजप नेते आहेत, त्यांना फडणवीस काय ते सांगतील. हे जे घडलं आहे, ते आम्हाला कोणालाही आवडलं नाही.”