राजेगाव परिरात वाहतुकीच्या कोंडीबरोबरच अपघातांचे प्रमाणही वाढले
राजेगाव -पुणे-सोलापूर महामार्गावर थांबवण्यात येणाऱ्या बेशिस्त वाहनामुळे या रस्त्यावर वाहतुकीच्या कोंडीची समस्या कायमचीच झाली आहे. महामार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने थांबवली जातात. विशेषतः रात्रीच्या वेळी थांबवली जाणारी वाहने कोणतेही नियम पाळत नाहीत आणि त्यामुळे या रस्त्यावर अपघातप वाढत असल्याने अशा वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिकांमधून होत आहे.
पुणे-सोलापूर महामार्गांने रोज हजारो वाहने ये-जा करीत असतात; परंतु या रस्त्याच्या शेजारी असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने थांबवण्यात येत आहेत, यामुळे वारंवार अपघात घडत असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याचा सर्वाधिक फटका स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे.
या महामार्गावर अनेक हॉटेल, धाबे, गॅरेज आहेत. याठिकाणी वाहने थांबवण्यात येतात, यामुळे वाहतुकीस अडथळा येतो. वाहतुकीच्या या समस्येबरोबरच या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने ते वाचवण्यासाठी काही चालक धडपड करत असतात एकीकडे खड्डे आणि दुसरीकडे थांबवलेली वाहने चुकवताना हमखास अपघात होत आहेत. पोलिसांनी माहामार्गावर अशी बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
ऊसवाहक वाहनांमुळे अपघात वाढले
पुणे-सोलापूर महामार्गावर सध्या ऊसवाहक वाहने वाढली आहेत. मात्र, क्षमतेपेक्षा अधिक ऊस या टेम्पो-ट्रॅक्टरमधून नेला जात असल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे. अनेकवेळा टेम्पो आणि ट्रॅक्टर ट्रॉल्या उसाच्या अधिक भारामुळे रस्त्याच्या एका बाजूला कलंडल्या जात आहेत. ट्रॅक्टरचालक मोठ्या आवाजात गाणी लावत असतात, त्यामुळेही इतर वाहनचालकांचे लक्ष विचलित होते. या गोष्टींचा गांभीर्याने विचार करून हे प्रकार महामार्गावर बंद होणे गरजेचे आहे.