Dimbhe Dam – हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आल्यामुळे आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील एकूण ४५ गावांमधील रब्बी हंगामातील शेती पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दीर्घकाळ पावसाअभावी आणि अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी हे पाणी जीवनदायी ठरणार आहे. उजव्या कालव्यातील पाण्याचा लाभ प्रामुख्याने ऊस, गहू, बटाटा, कांदा आदी पिकांना होणार असून उत्पादनात वाढ होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. रब्बी हंगामातील पिके सध्या वाढीच्या टप्प्यात असताना पाण्याची अत्यंत गरज होती.अशी मागणी पंचायत समितीच्या सदस्या अंकिता अनिल वाळूंज यांनी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पाणी सोडण्याची सूचना जलसंपदा विभागाला केली होती. उजव्या कालव्यातून पाणी मिळाल्याने पिकांची वाढ चांगली होणार आहे. शेतीपिकांसोबतच जनावरांसाठी हिरव्या चार्याच्या पिकांनाही या पाण्याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे दूध उत्पादन वाढण्यास मदत होईल, असा विश्वास पशुपालकांनी व्यक्त केला आहे.याशिवाय अनेक गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही काही प्रमाणात सुटणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. “धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय योग्य वेळी झाल्यामुळे शेतकरी, पशुपालक आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आगामी काळात पाण्याचे योग्य नियोजन व वाटप व्हावे,अशी अपेक्षा लाभार्थी गावांमधून व्यक्त होत आहे.” – मच्छिंद्र गावडे,संचालक, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना. “डिंभे धरण उजव्या कालव्याला पाणी मिळाल्याने रब्बी पिकांना जीवदान मिळाले आहे. ऊस, कांदा, गहू याच्यासह जनावरांच्या चाऱ्यासाठी हे पाणी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.” – अरविंद वळसे पाटील,भाजप नेते, आंबेगाव तालुका.