Dilip Walse Patil: थेट मुख्यमंत्र्यांकडेच केली मागणी! डिंभे बोगद्याला दिलीप वळसे-पाटलांचा सक्त विरोध; नेमकं कारण काय?
Dilip Walse Patil: डिंभे धरणातील (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) प्रस्तावित बोगद्याला माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा ठाम विरोध; शासनाला दिले लेखी पत्र.

Dilip Walse Patil – डिंभे धरणातील (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) प्रस्तावित बोगद्याला माझा ठाम आणि सक्त विरोध असून बोगदा मान्य नसल्याबाबत मी शासनाला लेखी पत्र दिले आहे. तसेच पुणे नाशिक रेल्वे खेड, आंबेगाव जुन्नर तालुक्यातूनच न्यावी याबाबतची आग्रही मागणी केली आहे.श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रश्नाची वस्तुस्थिती सांगितली असून यासंदर्भात तातडीने बैठक बोलावून निर्णय घ्यावा, अशी मागणी केल्याची माहिती माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंचर येथे आयोजित पत्रकार परिषदेत रविवार, दि.14 रोजी दिली.
मंचर येथे झालेल्या पत्रकार परिषदेसाठी यावेळी शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, सभापती कैलासबुवा काळे, निलेश स्वामी थोरात, अजय घुले, राहुल पडवळ, प्रशांत बागल आदी उपस्थित होते. वळसे पाटील म्हणाले की, डिंभे धरणातील बोगद्याचा काही घटकांकडून पाठपुरावा सुरू असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी या विषयावर चर्चा झाली होती.
त्यावेळी बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याची आठवणही मुख्यमंत्र्यांना करून दिली आहे. पुणे-नाशिक रेल्वे मार्गाबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून हा मार्ग याच परिसरातून जावा, अशी मागणी करण्यात आली आहे. परदेशी तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी रेल्वे मूळ मार्गाने नेणे शक्य असल्याचा अभिप्राय दिला आहे. त्यांचा अहवाल सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या असून डिंभे बोगदा व पुणे-नाशिक रेल्वे या दोन्ही विषयांचा पाठपुरावा पुढेही सुरू ठेवणार असल्याची ग्वाही वळसे पाटील यांनी दिली.





