Dilip Vengsarkar Statement : “अजिंक्यवर अन्याय झाला…”, रहाणेच्या निवृत्तीनंतर माजी खेळाडू दिलीप वेंगसरकरांचा बीसीसीआयवर थेट निशाणा
Dilip Vengsarkar Statement : दिलीप वेंगसरकर यांनी आपल्या भावना व्यक्त करत, "अजिंक्यवर अन्याय झाला आहे," असे थेट आणि परखड वक्तव्य केले आहे.

Former Indian captain Dilip Vengsarkar On Ajinkya Rahane Retirement : भारतीय क्रिकेट संघाचा माजी उपकर्णधार आणि मराठमोळा फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर क्रीडा जगतातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. रहाणेच्या निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि ज्येष्ठ निवडकर्ते दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांनी आपल्या भावना व्यक्त करत, “अजिंक्यवर अन्याय झाला आहे,” असे थेट आणि परखड वक्तव्य केले आहे.
“अजिंक्य म्हणजे परदेशात चमकणारे हुकूमी नाणे!”
दिलीप वेंगसरकर म्हणाले, “अजिंक्यच्या कल्पक नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजय मिळवला होता. मार्च २०१७ च्या धरमशाला कसोटीत त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियाला नमवले, पण अवघ्या सहा महिन्यांत त्याला १२ वा खेळाडू म्हणून बेंचवर बसवण्यात आले. २०१८ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही पहिल्या दोन कसोटींतून त्याला वगळण्यात आले आणि तिसऱ्या सामन्यात थेट संघात घेतले गेले. अशा प्रकारे सातत्याने संघातून आत-बाहेर (In and Out) केल्यामुळे त्याच्या आत्मविश्वासावर विपरीत परिणाम झाला.”
वेंगसरकर पुढे म्हणाले की, रहाणेचे तंत्र आणि बचावात्मक शैली (Defense) कसोटीसाठी सर्वोत्तम होती. परदेशातील कठीण खेळपट्ट्यांवर आणि वेगवान गोलंदाजीसमोर तो भारताचे हुकूमी नाणे ठरला.
“कॅप नंबर २७८ निरोप घेतोय…” – रहाणेला अश्रू अनावर!
Senior India batter Ajinkya Rahane announces retirement from international cricket.#AjinkyaRahane pic.twitter.com/CVtwVE5n82
— All India Radio News (@airnewsalerts) July 30, 2026
आपल्या निवृत्तीच्या संदेशात चाहत्यांचे आणि पाठिराख्यांचे आभार मानताना अजिंक्य रहाणेला अश्रू अनावर झाले. तो म्हणाला, “क्रिकेटपटू म्हणून आम्ही यशापेक्षा अपयश जास्त पाहतो. माझ्याकडून चुका झाल्या, संघ हरला; पण तुम्ही मला नेहमीच डोक्यावर घेतले. तुमच्या प्रेमासाठी धन्यवाद. कॅप क्रमांक २७८ (Cap No. 278) आता निरोप घेत आहे.”‘
रहाणेने २०२३-२४ च्या मोसमात मुंबईला रणजी करंडक जिंकवून दिला होता आणि २०२४-२५ मध्येही मुंबईचे नेतृत्व केले होते.





