Ambadas Danave : फडणवीस, अजित पवारांच्या अर्थसंकल्पातील आकडेवारीत तफावत: अंबादास दानवेंचा आरोप, म्हणाले ‘बिहार’ हे राजकीय गरज….

पुणेः काल देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच शेतकरी, महिला, उद्योजक आणि तरुणांना डोळ्यांसमोर ठेवून अनेक योजना या अर्थसंकल्पातून सादर करण्यात आल्या आहेत. २०२३ च्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने आंध्र प्रदेश राज्यासाठी मोठ्या निधीची तरतूद केली होती.
यंदाच्या अर्थसंकल्पात मोदी ३.० ने बिहार राज्याच्या विकासासाठी भरीव नधीची तरतूद केली आहे. अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प म्हणजे मैलाचा दगड असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील घेतलेल्या निर्णयांचे स्वागत केले. फडणवीस आणि अजित पवार यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला आणि पुण्याला मिळालेल्या निधीची आकडेवारी जाहीर केली आहे.
यावरून विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी दोघांच्या आकडेवारील तफावत असल्याचे म्हटले आहे. फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज आणणायला हवे होते. मात्र, दिल्ली महाराष्ट्राला गृहीत धरते हे आजच्या अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले. दुसरीकडे बिहार हे राजकीय गरज म्हणून नवे लेकरू या सरकारने मांडीवर बसवून घेतले असल्याची खरमरीत टीका दानवे यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून केली आहे.
….आता मनमानी पद्धतीने निर्णय घेता येणार नाही
मेडिकल क्षेत्रातील जागा वाढवण्याची घोषणा झाली, मात्र प्रत्यक्षात त्यासाठी आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर आणि शिक्षकांची संख्या अपुरी आहे. हे अनेकदा अधोरेखित झाले आहे. आणि ही संख्या वाढवण्याबाबत कोणतीही चर्चा या अर्थसंकल्पात नसल्याचे देखील दानवे म्हणाले आहेत. बाकी राहिला विषय १२ लाखांपर्यंत आयकारातून सुटीचा, लोकसभेच्या निवडणुकीत मध्यमवर्गाने दिलेला झटका पाहता आता मनमानी पद्धतीने निर्णय घेता येणार नाही याची कल्पना असल्याने हा निर्णय झाला असल्याचे टीका त्यांनी केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्र! असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
फडणवीस यांनी सांगितलेली आकडेवारी
– मुंबई मेट्रो : 1255.06 कोटी
– पुणे मेट्रो : 699.13 कोटी
– एमयुटीपी : 511.48 कोटी
– एमएमआरसाठी एकात्मिक आणि हरित प्रवासी सुविधा: 792.35 कोटी
– मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे : 4004.31 कोटी
– सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक क्लस्टर : 1094.58 कोटी
– महाराष्ट्र ग्रामीण जोडसुधार प्रकल्प: 683.51 कोटी
– महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क : 596.57 कोटी
– नागनदी सुधार प्रकल्प : 295.64 कोटी
– मुळा-मुठा नदी संवर्धन : 229.94 कोटी
– ऊर्जा कार्यक्षम उपसा सिंचन प्रकल्प : 186.44 कोटी
अजित पवारांनी सांगितलेली आकडेवारी
केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला एमयुटीपी-३ प्रकल्पासाठी १४६५ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. पुणे मेट्रोसाठी ८३७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुळा मुठा नदी संवर्धनासाठी जायकांतर्गत २३० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या चार प्रकल्पांसाठी ४ हजार ३ कोटी, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे – प्रशिक्षण संस्थेसाठी १२६ कोटी ६० लाख, मुंबई मेट्रोसाठी १६७३ कोटी ४१ लाख, महाराष्ट्र ग्रामीण दळणवळण सुधारणांसाठी ६८३ कोटी ५१ लाख, महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क-मॅग्नेट प्रकल्पासाठी ५९६ कोटी ५७ लाख, ऊर्जा संवर्धन व लिफ्ट इरिगेशन प्रकल्पासाठी १८६ कोटी ४४ लाख, इंटीग्रेटेड ग्रीन अर्बन मोबिलिटी प्रकल्प मुंबईसाठी ६५२ कोटी ५२ लाख, सर्वसमावेशक विकासासाठी आर्थिक क्लस्टर जोडणी कामांसाठी १०९४ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी महाराष्ट्राला मिळाला असल्याची माहिती अजित पवार यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून दिली आहे.





