“दीदी तुमचे रक्षण करेल… बंगालमध्ये वक्फ कायदा लागू होणार नाही”; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं मोठं विधान

Mamata Banerjee – राज्यात वक्फ (दुरुस्ती) कायदा लागू केला जाणार नाही. अल्पसंख्याक लोकांचे आणि त्यांच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी योग्य ती पावले उचलले जातील. मला माहिती आहे की, तुम्ही वक्फ कायद्याच्या अंमलबजावणीवर नाराज आहात.
विश्वास ठेवा, बंगालमध्ये असे काहीही घडणार नाही, ज्यामुळे समाजात फूट निर्माण करून कोणीही राज्य करू शकेल, असे प्रतिपादन तृणमूल काॅंग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे.
मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या लोकांमध्ये आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षादरम्यान बॅनर्जी यांनी बुधवारी वरीलप्रमाणे घोषणा केली. कोलकाता येथे जैन समुदायाच्या विश्व नवकार महामंत्र दिवस कार्यक्रमाला त्या संबोधित करत होत्या.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, बांगलादेशातील परिस्थिती पहा. वक्फ संशोधन विधेयक आता पास व्हायला नको होते. तुम्ही जगा आणि जगू द्या, हा संदेश दिला पाहिजे. बंगालमध्ये राहणाऱ्या लोकांना सुरक्षा प्रदान करणे हे आमचे काम आहे.
मी तुम्हा सर्वांना आवाहन करते की, जर कोणी तुम्हाला राजकीयदृष्ट्या एकत्र येण्यास चिथावणी देत असेल तर कृपया तसे करू नका. दीदी तुमचे आणि तुमच्या मालमत्तेचे रक्षण करेल. जर आपण एकत्र राहिलो तर आपण जग जिंकू शकतो.
बॅनर्जी म्हणाल्या, आम्ही प्रत्येक परंपरा पाळतो, आम्हाला लहानपणापासूनच सर्व धर्मांबद्दल प्रेम शिकवले गेले आहे. मला विचारले जाते की, तुम्ही प्रत्येक धर्माच्या कार्यक्रमाला का जाता? मी त्यांना सांगते की,
मी नेहमीच पुढे जात राहीन. तुम्ही माझ्यावर गोळीबार केला तरी माझ्या हृदयातून एकता काढून टाकू शकत नाही. आपल्याकडे प्रत्येक धर्माचे आणि परंपरेचे सण आहेत. सर्व धर्मांचे लोक मानवतेसाठी प्रार्थना करतात.
मुर्शिदाबादमध्ये झाला हिंसाचार
काल मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याच्या विरोधात झालेल्या निदर्शनादरम्यान हिंसाचार झाला होता. निदर्शकांना रस्ता रोखण्यापासून रोखले असता पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली.
यानंतर आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली आणि त्यांना आग लावली. आंदोलकांना शांत करण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.





