कोलकाता – प. बंगालच्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात गेलेले सुवेंदु अधिकारी, मुकुल रॉय यांच्यासह ककली घोष दस्तीदार आणि सौगता रॉय यांची चौकशी करण्याची परवानगी मिळाली नसल्याचे केंद्रीय अन्वेषण पथकाच्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. तृणमूल कॉंग्रेसच्या चार मंत्र्यांच्या अटकेवरून रण माजले असतानाच सीबीआयच्या या खुलाशाने नवा गुंता निर्माण झाला आहे.
फिरहाद हकीम आणि सुब्राता मुखर्जी हे मंत्री आणि आमदार मदन मित्रा, कोलकात्याचे माजी महापौर शोवन चटोपाध्याय यांना लाच प्रकरणात सीबीआयने अटक केली. त्यांचे आरोपपत्र विशेष सीबीआय न्यायालयात दाखल करण्यात आले.
2014 मध्ये हा गुन्हा घडला त्यावेळी अधिकारी, मुकुल रॉय यांच्यासह ककली घोष दस्तीदार आणि सौगातात रॉय हे लोकसभा सदस्य होते. त्यांची चौकशी करण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून अद्याप परवानगी मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात अद्याप आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही.
विधिमंडळ सदस्य असणाऱ्या अन्य आरोपींवर कारवाई करण्याची परवानगी राज्यपाल जगदीप धनकर यांनी दिल्याने फिरहाद हकीम, मदन मित्रा, सुब्राता मुखर्जी आणि शोवन चटर्जी यांना अटक करण्यात आली आहे.
सोमवारी सीबीआय न्यायालयाने या चारही जणांना जामीन मंजूर केला. त्याला कोलकाता उच्च न्यायालयात सीबीआयने आव्हान दिले. त्यानंतर उच्च न्यायालयाने हा जामीन फेटाळला. त्यांना पुढील आदेश मिळेपर्यंत न्यायालयीन कोठडीत असल्यासारखी वर्तणूक देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.