Accident : भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला; देवदर्शनावरून परतणाऱ्या पिकअपला कंटेनरची धडक, दोघांचा मृत्यू
Accident : धाराशिवच्या आळणी फाटा येथे देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपला कंटेनरची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात दोन भाविकांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत.

Accident : धाराशिव जिल्ह्यातील आळणी फाटा येथे देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपला कंटेनरने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, उमरगा तालुक्यातील बोरी गावातील भाविक देवदर्शन करून पिकअप वाहनातून परतत असताना आळणी फाटा परिसरात समोरून येणाऱ्या कंटेनरची पिकअपला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की पिकअप वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला.
या अपघातात बब्रुवान सूर्यवंशी (वय 68) आणि छबुबाई दूधभाते (वय 52) या दोघांचा मृत्यू झाला. दोघेही उमरगा तालुक्यातील बोरी गावचे रहिवासी होते.
अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना त्वरित धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पंचनामा आणि पुढील तपास सुरू आहे.
जळगावमध्येही भीषण अपघात –
दरम्यान, जळगाव शहरातील इच्छादेवी चौकात कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन आणखी एक गंभीर अपघात घडला. या दुर्घटनेत लीलाधर मंगल पाटील (वय 36) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर कारमधील चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
कामावर जात असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. धडक इतकी जोरदार होती की कारने दुचाकीला उडवल्यानंतर दुभाजकावर आदळून दोन वेळा पलटी घेतली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.





