BJP Leader Death: झारखंडमधील धनबाद येथे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि एससी मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष अमृत दास यांचा मृतदेह राहत्या घरात संशयास्पद स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. दोन सख्ख्या बहिणींशी विवाह केलेल्या दास यांचा मृत्यू त्यांच्या पत्नींमधील वादातून झाल्याचा प्राथमिक आरोप कुटुंबीयांनी केला आहे. शॉपिंगवरून उफाळला वाद – मिळालेल्या माहितीनुसार, अमृत दास यांनी दोन सख्ख्या बहिणींशी लग्न केले होते. शुक्रवारी (१ मे) सकाळी त्यांचा मृतदेह घरात आढळून आला. मृत्यूच्या आदल्या दिवशी दास हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीला शॉपिंगसाठी बाजारात घेऊन गेले होते. या कारणावरून पहिली पत्नी कमालीची संतापली होती. यावरून दोन्ही पत्नींमध्ये गुरुवारी रात्री जोरदार राडा झाला होता. या वादातूनच त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय त्यांच्या आईने आणि बहिणीने व्यक्त केला आहे. पोलीस तपासाला वेग – गोविंदपूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांकडून त्यांच्या घराच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले जात आहे. घटनास्थळावरून काही महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले असून फॉरेन्सिक रिपोर्टची प्रतीक्षा आहे. दोन्ही पत्नींसह इतर सदस्यांचे जबाब नोंदवले जात आहेत. हत्या की आत्महत्या? “मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल (Post-mortem) आणि फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच ही हत्या आहे की आत्महत्या, हे स्पष्ट होईल,” अशी माहिती गोविंदपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी विष्णू प्रसाद रावत यांनी दिली. या घटनेमुळे धनबादच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्याची मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे.