Dhairyashheel Kadam: “सात जन्म झाले तरी विसरणार नाही…” गोरेगाव वांगीत पाऊल ठेवताच आ. धैर्यशील कदमांनी काय शब्द दिला?
Dhairyashheel Kadam: गोरेगाव वांगी येथे नवनिर्वाचित आमदार धैर्यशील कदम यांचा भव्य नागरी सत्कार; माता-भगिनींकडून औक्षण तर ग्रामस्थांकडून करण्यात आली वहीतुला.

Dhairyashheel Kadam – गोरेगाव वांगी येथून 1990 साली सुरू झालेला माझा राजकीय प्रवास आज आमदारकीपर्यंत पोहोचला आहे. मी आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. अनेक कठीण प्रसंगांना सामोरा गेलो. या संघर्षाच्या प्रत्येक वळणावर गाव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आज मी जो काही आहे, तो माझ्या गावाच्या आणि इथल्या माणसांच्या अथांग प्रेमामुळे आहे.
ग्रामस्थांचे हे उपकार आणि मातीचे ऋण मी सात जन्मांतही विसरू शकत नाही, अशा शब्दांत विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार धैर्यशील कदम यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. आमदारपदी निवड झाल्यानंतर धैर्यशील कदम यांचे स्वत:च्या गावी गोरेगाव वांगी (ता. खटाव) येथे आगमन झाले. यावेळी त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
गावात आगमन होताच आ. कदम यांचे माता-भगिनींनी औक्षण केले. ग्रामस्थांच्यावतीने त्यांची वहीतुला करण्यात आली. या सत्काराला उत्तर देताना आ. धैर्यशील कदम म्हणाले, तुम्ही माझ्यावर दाखवलेला विश्वास वाया जाऊ देणार नाही. आमदारकीच्या माध्यमातून गोरेगाव वांगीचा सर्वांगीण विकास करणे, ही माझी पहिली जबाबदारी आहे. गावातील रस्ते, पाणी, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा उच्च दर्जाच्या केल्या जातील.
तरुणांना रोजगार आणि शेतकर्यांच्या शेतीला बळ देण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. यावेळी दादा महाराज, बबनराव कदम, अर्जुन कदम, वसंतराव कदम, भैरवनाथ शिंदे, आप्पा शिंदे, महादेव शिंदे, जयवंतराव कदम, दत्तात्रय कदम, नामदेव कदम, रवींद्र कदम, सत्वशील कदम, विक्रमशील कदम, अनिल शिंदे, सचिन जगताप, तानाजी कदम, राजेंद्र चव्हाण, आनंद सावंत, रामदास माळी, ग्रामस्थ, महिला आणि तरुण उपस्थित होते.सिद्धेश्वर कदम यांनी प्रास्ताविक केले. आनंदराव कदम यांनी सूत्रसंचालन केले. अमित जाधव यांनी आभार मानले.



