तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त राज्यभरातून भाविक देहूनगरीत दाखल; प्रशासनाकडून जय्यत तयारी, या दिवसाला एवढं महत्व का आहे?

Tukaram Maharaj Beej | आज जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या ३७५ व्या तुकाराम बीज सोहळा संपन्न होत आहे. या सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक देहूत दाखल झाले आहेत. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. लाखोंच्या संख्येने भाविक या सोहळ्यानिमित्ताने देहूत येत असल्याने येथे मोठे भक्तीमय वातावरण तयार झाले आहे.
आज सकाळपासूनच भक्तांची रीघ देहूकडे कूच करत आहे. गर्दीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनानेही खरदारीचा उपाय म्हणून विविध ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहे. तुकाराम बीज या सोहळ्याला एक विशेष महत्व आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही या सोहळ्याला हजेरी लावणार असल्याची माहिती आहे. या सोहळ्याच्या अनुषंगाने देहूनगरीत येणाऱ्या भाविक वारकऱ्यांना सोयी-सुविधा पुरवण्यासाठी नगरपंचायत प्रशासन, शासकीय यंत्रणाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
या दिवसाचे महत्व अलौकिक
संत तुकाराम महाराजांचा जन्म देहू गावात वसंत पंचमीला माघ शुद्ध पंचमीला झाला. तर त्यांचं वैकुंठ-गमन फाल्गुन वद्य द्वितीयेला झालं असं मानलं जातं. संत तुकाराम महाराजांना देह सदेह वैकुंठात घेऊन गेल्याची मान्यता आहे. या दिवसाला तुकाराम बीज असे म्हटले जाते. तुकाराम महाराजांचं वैकुंभगमन देहू (पुणे) येथे इ.स. 1649 मध्ये झाले, असं वारकरी संप्रदाय मानतो. या दिवशी नांदुरकी वृक्ष (देहू येथील एक झाड) दुपारी 12.02 वाजता हलतो, असा भक्तांचा विश्वास आहे. हा दिवस वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचा मानला जातो.
यावरून मतमतांतरे
देहूत राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी दाखल होतात. नामस्मरण, कीर्तन, प्रवचन, भजन आणि गाथा पारायणाचे आदी कार्यक्रमाचे आयोजन होते. संत तुकाराम महाराज शरीरासह वैकुंठात गेले की नाही याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. काही संत साहित्यिकांच्या मते, संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन किंवा इतर बाबतीत कोणतेही ठोस पुरावे नाहीत.
उपमुख्यमंत्री एकना शिंदेंचा सन्मान
या पवित्र सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा देहू संस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी केली आहे. पालखी सोहळ्यात शिंदे यांनी दिंड्यांना आर्थिक सहाय्य, स्वच्छता मोहिम आणि इतर विविध सुविधा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल त्यांना ‘श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.





