Devendra Fadnavis : आता बिहारमध्ये महाराष्ट्राची बदनामी; देवेंद्र फडणवीस यांची राहुल गांधींवर अप्रत्यक्ष टीका

मुंबई : परदेशात जाऊन देशाची बदनामी करणारे आता बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्राला बदनाम करत आहेत. पण यांना ना परदेशात कोणी विचारले, ना बिहारमध्ये कोणी विचारेल. जी परिस्थिती यांची महाराष्ट्रात झाली, तीच परिस्थिती बिहारमध्ये होणार आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केली.
मुंबईत रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ‘आपला भाऊ, देवा भाऊ’ या कार्यक्रमात ते बोलत होते. लाडकी बहीण योजना ही 5 वर्ष कोणीही बंद करणार नाही, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुमच्या आशीर्वादामुळेच आम्हाला यश मिळाले. या यशामुळे तुम्ही आनंदी आहात, पण काही जणांचे अजूनही समाधान झालेले नाही. हे रोज मतचोरी झाल्याचे म्हणतात.
मतचोरी नाही, तर यांचेच डोके चोरीला गेले आहे. बहिणींना विनंती आहे की, यांना अक्कल यावी यासाठी त्यांच्यासाठीही आशीर्वाद मागा. आमच्या लाडक्या बहिणींच्या मतांना जर हे चोरी म्हणत असतील, तर यांच्यापेक्षा मोठे चोर कोण असतील?, असा सवाल त्यांनी यावेळी केला. जगाच्या पाठीवर अमेरिका, युरोप, जपान, कोरिया ज्या देशांनी विकास केला त्या देशाच्या लोकसंख्येतील 50 टक्के सहभाग महिलांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित करुन देशाच्या मुख्यधारेत, अर्थव्यवस्थेत आणण्यात आले.
तसे केल्यास देशाच्या विकासाची गती दुपटीने वाढेल. यामुळे ते विकसित अर्थव्यवस्थेकडे गेले तसेच मोठ्या प्रमाणात विकसित झाले. आता तीच भारताची वाटचाल सुरु झाली आहे. पुढच्या 20 वर्षात भारत जगातील पहिली किंवा दुसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. यामध्ये तुमची भागीदारी महत्त्वाची असणार असल्याचे ते म्हणाले.





