Devendra Fadnavis : “मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहील”; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल !

Devendra Fadnavis – चार महिन्यानंतर भाषणे सुरू होतील, महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचे षडयंत्र सुरू आहे. पण, आताच सांगतो मुंबईला महाराष्ट्रापासून कुणी तोडू शकत नाही. कुणाचा बाप, बापाचा बाप आणि त्याचा बाप, त्याचा आजोबा आला तरी मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहील, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. यावेळी फडणवीस यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या माझी मैना गावावर राहिली या कवितेतील काही ओळी म्हटल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, सिडकोचा विकास, इंदू मिल स्मारक, नवी मुंबईतील एक्झिबिशन सेंटर अशा अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत. २०१४ ते २०१९ दरम्यान मी जे बोललो ते सगळे प्रकल्प होताना दिसत आहेत.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी कुठल्याही प्रकल्पांचा वेग कमी होऊ दिला नाही. अजित पवार हे कुबेर आहेत. त्यांच्याकडे तिजोरीची किल्ली आहे. त्यांनी तिजोरी अडवली नाही. नाहीतर डुप्लिकेट किल्ली करावी लागली असती. पण, ती संधी अजित पवार यांनी दिली नाही.
सामान्य माणसांचा चेहरा बदलणारे प्रकल्प हे निश्चितपणे करून दाखवणार आहोत. प्रत्येक वर्ष दोन वर्षांनी लोक मुंबईत येतात. त्यांना ती दरवेळी बदललेली दिसते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जी व्यथा मुंबईत अनुभवली, ती कुणाच्याही वाट्याला येऊ नये.
अशाप्रकारचा प्रयत्न आपण करत आहोत. अण्णाभाऊ साठे यांची मुंबईवर एक कविता आहे, या मुंबईत गर्दी बेकारांची, त्यात भरती झाली माझी एकाची असे म्हणत कवितेच्या ओळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलून दाखवल्या.





