Devendra Fadanvis : दावोसमध्ये भारतीय कंपन्यांसोबत सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यावरून झालेल्या टीकेचे खंडन करत, आर्थिक जगात प्रासंगिक राहण्यासाठी उपस्थिती आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी म्हटले आहे. तसेच विरोधी पक्ष हे गोंधळलेले आहेत, असे म्हणत विरोधकांवर टीका केली. विधिमंडळात राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेवेळी फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. फडणवीस यांनी म्हटले की, सरकारच्या विकसित महाराष्ट्र दस्तऐवजात पुढील चार ते पाच वर्षांत राज्याला एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचा रोडमॅप आणि दृष्टिकोन मांडण्यात आला आहे. विरोधी पक्ष तथ्य नसलेल्या आधारे सरकारला लक्ष्य करत आहेत. ते गोंधळलेले आहेत. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत भारतीय कंपन्यांसोबत सामंजस्य करारांवर झालेल्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, जर आर्थिक जगात प्रासंगिक राहायचे असेल तर दावोसमध्ये उपस्थिती आवश्यक आहे, म्हणून मी तेथे राज्याचे प्रतिनिधित्व केले. या ठिकाणी गेल्या काही वर्षांत आम्ही महाराष्ट्राबद्दल चांगली चर्चा निर्माण करण्यात यशस्वी झालो आहोत. २०२४ मध्ये स्वाक्षरी केलेल्या ७० टक्के करारांची आणि २०२५ मध्ये स्वाक्षरी केलेल्या ८८ टक्के करारांची अंमलबजावणी सुरू आहे. राष्ट्रीय पातळीवरील ३५ टक्के सामंजस्य करार हे गुंतवणुकीत रूपांतरित होतात, परंतु महाराष्ट्रात हे प्रमाण ५५ टक्के असल्याचा दावा त्यांनी केला. दावोसमध्ये स्वाक्षरी झालेल्या ७५ टक्क्यांहून अधिक सामंजस्य करारांचे गुंतवणुकीत रूपांतर झाले असल्याचे ते म्हणाले. तसेच, महाराष्ट्रातील बेरोजगारीचा दर २०२१-२०२२ मधील ४ टक्क्यांवरून २०२५ मध्ये ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. रिक्त सरकारी पदांवर राज्य सरकारने १ लाख २० हजार नियुक्ती पत्रे दिली आहेत. स्थानिक लोकसंख्येच्या सहभागाने गडचिरोली हे स्टील हबमध्ये रूपांतरित होत आहे. सरकारच्या विकास अजेंड्यावर लोकांचा विश्वास असल्याने नक्षलवाद संपला आहे. देशातील २० टक्के स्टार्ट-अप उद्योग महाराष्ट्रात आहेत. पहिलीपासून हिंदी शिकणे अनिवार्य करण्याचा माशेलकर समितीचा अहवाल स्वीकारल्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारला त्यांनी दोष दिला. आमच्यासाठी फक्त मराठीच अनिवार्य आहे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रम मातृभाषेत शिकवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानू इच्छितो. फडणवीस पुढे म्हणाले, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना १५,४७२ कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे आणि योग्य वेळी कर्जमाफीही केली जाईल.आम्ही शेतकऱ्यांचे डिजिटल रेकॉर्ड तयार करत आहोत जेणेकरून फक्त गरजूंनाच कर्जमाफी मिळेल. आम्ही २३,००० कोटी रुपयांचे वीज बिल माफ केले आहे आणि तीन वर्षांत त्यांना १० लाखांहून अधिक कृषी पंप देण्यात आले आहेत. मुंबईतील इंदू मिलच्या जमिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम सुरू आहे. २३० फूट उंचीचा पुतळा तयार आहे आणि त्यासाठी ४०० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे, असेही फडणवीस म्हणाले. युवा प्रशिक्षण अभियानावर भाष्य (Devendra Fadanvis) सभागृहात आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेल्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण अभियानासंदर्भातील प्रश्नावर उत्तर दिले. फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण अभियान हे 11 महिन्यांसाठी असणार ते आधीच घोषित केले होते. इतरत्र नोकरीला जाताना उमेदवारांना फायदा व्हावा यासाठी त्यांना अनुभवपत्र देण्यात आले होते. प्रशिक्षणार्थी युवकांना पर्मनंट करणार हे सांगितल्याचे जाधव म्हणाले, तसे रेकॉर्ड आमच्याकडे आहे असेही ते बोलले. मात्र, तसे रेकॉर्ड असेल तर पाठवून द्या. युवा प्रशिक्षण युवकांना पर्मनंट करतो हे सांगणाऱ्या मंत्र्याचा अहवालच राज्यपालांकडे पाठवतो, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधवांचे मत खोडून काढले.