Pavana Dam: नदीकाठी न जाण्याचा इशारा, तरी जीव धोक्यात घाऊन धुतली जातायत कपडे
Pavana Dam: नागरिकांच्या एका क्षणाच्या निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना घडू शकते

पिंपरी– पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात सोमवारी दिवसभरात तीन टप्प्यांत वाढ करण्यात आली. सायंकाळी ४ वाजेपर्यंत धरणातून तब्बल ११,२५० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता.
पावसाचा जोर कायम राहिल्यास हा विसर्ग १५ हजार क्युसेक किंवा त्याहून अधिक होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.या वाढत्या विसर्गामुळे पवना नदी दुथडी भरून वाहत असून थेरगाव, पुनावळे, वाल्हेकरवाडी तसेच पिंपरी-चिंचवडमधील सखल भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
नदीकाठच्या अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्याने शेतीचेही नुकसान होत आहे. खडकवासला पाटबंधारे विभाग आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने नागरिकांना नदीपात्र, पूल आणि सखल भागात जाणे टाळण्याचे स्पष्ट आवाहन केले आहे.
मात्र, प्रशासनाच्या वारंवारच्या इशाऱ्यानंतरही वाल्हेकरवाडी परिसरात काही महिला पुराच्या पाण्यालगत नदीपात्रात उतरून भांडी व कपडे धुताना दिसून आल्या. नदीत पाण्याचा प्रवाह वेगाने वाढत असताना अशी कृती स्वतःचा जीव धोक्यात घालणारी ठरत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.
धरणातून होणाऱ्या विसर्गात कोणत्याही क्षणी वाढ होऊ शकते. अशा वेळी नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूरस्थितीत केवळ स्वतःचीच नव्हे तर बचाव पथकांचीही अडचण वाढते.
त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी नदीपात्रात उतरू नये, कपडे-भांडी धुणे, फोटो किंवा व्हिडिओ काढण्यासाठी नदीकाठावर गर्दी करणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांच्या एका क्षणाच्या निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना घडू शकते, त्यामुळे सतर्कता हाच सर्वोत्तम उपाय असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.





