नवी दिल्ली – राजस्थानात पुन्हा एकदा सत्ता प्राप्तीसाठी संघर्ष करत असलेल्या भारतीय जनता पार्टीला (Bjp) आज बूस्टर मिळाला आहे. त्याचे कारण आज म्हणजे मंगळवारी महाराणा प्रताप सिंह यांचे वंशज विश्वराज सिंह मेवाड (Vishwaraj singh mewad) आणि करणी सेनेचे (Karani sena) संस्थापक लोकेंद्र सिंह कालवी यांचे पुत्र भवानी सिंह कालवी (Bhawani singh kalavi) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
या दोघांना पक्षात प्रवेश देऊन भाजपने (bjp) मोठी खेळी खेळली असल्याचे मानले जाते आहे. पक्षाचे राजस्थान शाखेचे प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी, (C P josahi) केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल, राष्ट्रीय सरचिटणीस अरूण सिंह आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत या दोन नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राजस्थानच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या सक्षम आणि दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाचे समर्थन केले पाहिजे असे आवाहन विश्वराज सिंह मेवाड यांनी यावेळी केले. मेवाड यांचे पिता महेंद्रसिंह मेवाड हे 1989 मध्ये चित्तोगड येथून भाजपच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून आले होते. तर कालवी हे प्रख्यात पोलो खेळाडू आहेत. हे दोन्ही नेते राजपूत समुदायातील आहेत.
दरम्यान, या पक्षप्रवेशामुळे राजस्थानातील राजकारणाचा पारा पुन्हा एकदा वाढला आहे. मेवाड यांना नाथद्वारा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. तर कालवी हे नागोरच्या डेगाना अथवा लाडनू येथून रिंगणात उतरवले जाऊ शकतात. या दोघांना प्रवेश देत भाजपने राजपूत समुदायात आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. या समुदायाची राज्यातील लोकसंख्या 11 ते 12 टक्के असून अनेक मतदारसंघांवर त्यांचा प्रभाव आहे. असेही हा समुदाय पारंपरीक रित्या भाजपचाच मतदार राहीला आहे. तसेच अनेक मतदारसंघांचे निकाल फिरवण्याची ताकद समुदायात आहे.
2018 च्या निवडणुकीत काही कारणांमुळे राजपूत समाज भाजप नेत्या वसुंधरा राजे यांच्यावर नाराज होता आणि त्या पक्षापासून दूर गेला. त्याचा फटका भाजपला बसला आणि सत्ता गमवावी लागली होती. दिवगंत भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांना एकाकी पाडणे हेही समुदायाच्या नाराजीचे एक कारण होते.