पुणे जिल्हा | कऱ्हा- नीरा नदी जोडप्रकल्प राबविणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

बारामती, (प्रतिनिधी)- तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आगामी काळात कऱ्हा व नीरा नदी जोडप्रकल्प राबविणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. बारामतीत राष्ट्रवादी शहर काँग्रेसच्या वतीने एक कुटुंब एक झाड या उपक्रमाचा प्रारंभ अजित पवार यांच्या हस्ते झाला.
त्या प्रसंगी त्यांनी या महत्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली. दरवर्षी पावसाळयात नीरा नदीमध्ये पाणी येथे हे पाणी वाहून जाते, ते पाणी क-हा नदीला आणून मिळविण्यासह मधल्या पट्टयातील तलाव भरुन घेण्याची ही योजना असून बारामतीत रविवारी (दि. 4) संध्याकाळी बोरकरवाडीत होणा-या कार्यक्रमात याची सविस्तर माहिती देणार असल्याचे पवार यांनी जाहीर केले.
अजित पवार म्हणाले, महायुतीच्या योजनांवर विरोधक चुनावी जुमला म्हणून टीका करतात. अनेक विरोधक खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत, आम्ही मात्र सुसंस्कृतपणे विकासाच्या मुद्यावरच भूमिका मांडणार आहोत, कोणीही खालच्या पातळीवर जाऊन टीका करणार नाही, आमच्याकडे विकासाच्या सांगण्यासारख्या योजना असल्याने त्यावरच बोलू.
राज्य सहकारी बँकेबाबत माझ्यावर वाट्टेल ते आरोप करण्यात आले असे सांगून पवार म्हणाले, मी जसा स्वच्छतेचा भोक्ता आहे तसाच सुरवातीपासूनच आर्थिक शिस्त पाळणारा कार्यकर्ता आहे. राज्य सहकारी बँक किंवा पुणे जिल्हा बँक आर्थिक सुस्थितीत आहेत, हेही विचारात घ्यायला हवे. ज्या योजना आम्ही जाहीर केल्या आहेत. त्या कायमस्वरुपी चालविणार आहोत.
लाडकी बहीण कायमस्वरूपी राबविणार
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही कायमस्वरुपी राबविणार असून मी गेले दहा वर्षे अर्थमंत्री म्हणून कार्यरत आहे, अडीच कोटी महिला डोळ्यासमोर ठेवूनच ही योजना कार्यान्वित केली आहे, या साठी 46 हजार कोटींची गरज लागणार आहे, अर्थात सरकारने याची तयारी केलेली आहे,
अर्थात ही लोकशाही आहे
ते म्हणाले की, अर्थात ही योजना पुढे कायमस्वरुपी चालू ठेवायची असेल तर महायुतीच्या उमेदवारांसमोरील बटण दाबावे लागेल असे गंमतीने अजित पवार म्हणाले, लगेच अर्थात लोकशाही आहे, तुम्हाला योग्य वाटेल त्या उमेदवाराला तुम्ही मत देऊ शकता अशी पुस्तीही त्यांनी जोडली.





