Demis Hassabis : भारतीय तरुणांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) नव्या साधनांवर प्रभुत्व मिळवल्यास, ते आगामी जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचे खऱ्या अर्थाने नेतृत्व करू शकतील, असा विश्वास ‘गुगल डीपमाइंड’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डेमिस हसाबिस (Demis Hassabis) यांनी व्यक्त केला. बुधवारी नवी दिल्ली येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय तरुणांमधील ऊर्जा आणि एआय तंत्रज्ञानाकडे बघण्याच्या सकारात्मक दृष्टिकोनाचे तोंडभरून कौतुक केले. भारताकडे संसाधनांच्या काही मर्यादा असल्या तरी येथील प्रतिभेचा ओघ अफाट आहे, असे नमूद करताना हसाबिस म्हणाले की, भारतातील तरुणांमध्ये एआयबद्दल असलेला कमालीचा उत्साह पाहून मी भारावून गेलो आहे. एका ताज्या सर्वेक्षणाचा दाखला देत त्यांनी स्पष्ट केले की, जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतीयांमध्ये या तंत्रज्ञानाबद्दल सर्वाधिक सकारात्मकता आहे. हीच वैचारिक प्रगल्भता आगामी दशकात भारतासाठी सर्वात मोठे बलस्थान ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या दहा वर्षांत एआय साधनांचे सखोल ज्ञान तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात ‘सुपरपॉवर’ बनवू शकते. मग ते क्षेत्र उद्योग असो वा विज्ञान, एआयचा वापर तुमची कार्यक्षमता अनेक पटींनी वाढवेल. ज्याप्रमाणे संगणक, इंटरनेट आणि मोबाईल क्रांतीने जगाचा चेहरामोहरा बदलला, अगदी त्याच वळणावर आज आपण उभे आहोत. जी पिढी या तंत्रज्ञानासोबत वाढेल, ती भविष्यात अशी अकल्पनीय शिखरे पादाक्रांत करेल ज्याचा विचार आजही करणे कठीण आहे. या संपूर्ण प्रवासात भारतीय तरुण या क्रांतीचे अग्रदूत म्हणून ओळखले जातील, असा विश्वास हसाबिस यांनी यावेळी व्यक्त केला.