संरक्षण : नव्या लष्करप्रमुखांपुढील आव्हाने
जनरल धीरज सेठ यांच्या (General Dhiraj Seth) नेतृत्वाखाली भारतीय लष्करासाठी हा केवळ नेतृत्वबदलाचा क्षण नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेच्या नव्या युगाची सुरुवात आहे. पण नव्या लष्करप्रमुखांसमोर अनेक आव्हानेही आहेत.

– कर्नल अभय पटवर्धन, निवृत्त
General Dhiraj Seth : जनरल धीरज सेठ यांच्या (General Dhiraj Seth) नेतृत्वाखाली भारतीय लष्करासाठी हा केवळ नेतृत्वबदलाचा क्षण नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेच्या नव्या युगाची सुरुवात आहे. पण नव्या लष्करप्रमुखांसमोर अनेक आव्हानेही आहेत.
आज भारतासमोर अत्यंत गुंतागुंतीचे आणि वेगाने बदलणारे संरक्षणात्मक वातावरण उभे आहे. भारतीय लष्कर एका (General Dhiraj Seth) पारंपरिक लष्करी दलापासून बहुक्षेत्रीय, तंत्रज्ञानसक्षम आणि एकात्मिक राष्ट्रीय शक्तीच्या प्रभावी साधनामध्ये रुपांतरित होत असताना हा संक्रमणाचा कालखंड अधिक महत्त्वाचा ठरत आहे. अशा निर्णायक क्षणी जनरल धीरज सेठ यांनी 30 जून 2026 रोजी भारतीय लष्कराचे 31वे लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे.
नव्या लष्करप्रमुखासमोर केवळ नेतृत्वाचे नव्हे, तर परिवर्तनाचेही मोठे आव्हान असेल. वाढत्या सुरक्षा गुंतागुंतीच्या पार्श्वभूमीवर लष्कराचे कार्यान्वयन, संरचनात्मक पुनर्रचना, तांत्रिक आधुनिकीकरण आणि मर्यादित संसाधनांचे परिणामकारक व्यवस्थापन यांचा समतोल साधावा लागणार आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचे व्यवस्थापन, बहुक्षेत्रीय युद्धतंत्राचा स्वीकार, थिएटर कमांडची अंमलबजावणी व संरक्षण अर्थसंकल्पातील मर्यादा यांचा विचार करता त्यांच्यासमोरील जबाबदार्या अधिक व्यापक ठरतात.
भारतासमोर सध्या दुहेरी संरक्षणात्मक आव्हान उभे आहे. चीन सध्या तुलनेने संयमित भूमिका घेत असल्याचे दिसत असले तरी त्याची लष्करी आणि तांत्रिक प्रगती सातत्याने सुरू आहे. अचूक मारा, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वायत्त शस्त्रप्रणाली, सायबर क्षमता आणि बहुक्षेत्रीय एकात्मिक युद्धतंत्र यांवर आधारित त्याचे धोरण भविष्यातील युद्धाचे स्वरूप निश्चित करत आहे.
दुसरीकडे, मध्यपूर्वेतील घडामोडींमध्ये मध्यस्थीची भूमिका मिळाल्यानंतर पाकिस्तानचा आत्मविश्वास (General Dhiraj Seth) वाढल्याचे दिसून येते. विशेषतः फिल्ड मार्शल आसिम मुनीर यांनी ऑपरेशन बुनयान-उल-मर्सूसच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त केलेली विधाने आणि पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी सिंधू जल कराराच्या संदर्भात दिलेली युद्धाची अप्रत्यक्ष धमकी भारतासाठी गंभीर संकेत मानावे लागतील.
चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांची युद्धसंकल्पना वेगळी असली तरी त्यांचा उद्देश भारतावर संरक्षणात्मक दबाव निर्माण करणे हाच आहे. चीन बुद्धिमान युद्धतंत्र, अचूक लक्ष्यभेदन आणि बहु-क्षेत्रीय एकात्मिक मोहिमांवर भर देत आहे, तर पाकिस्तान विषम संसाधने, ड्रोन, प्रॉक्सी गट आणि आयातीत शस्त्रप्रणालींच्या सहाय्याने संकरित युद्धाची रणनीती अवलंबत आहे. या दोन्ही आव्हानांना उत्तर देण्यासाठी भारताला पारंपरिक युद्धतत्त्वांच्या पलीकडे जाऊन धाडसी लष्करी पुनर्रचना स्वीकारावी लागेल.
भविष्यातील युद्धात अवजड आणि स्थिर तैनातीपेक्षा हलक्या, चपळ आणि एकात्मिक युद्धगटांचे महत्त्व वाढणार आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जिथे पर्याय उपलब्ध आहेत, तिथे मानवी संसाधनांवरील अवलंबित्व कमी करणे आवश्यक ठरेल. मानवरहित शस्त्रप्रणाली, रोबोटिक्स, विशेष मोहिमा, विशेष दल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर भारतीय लष्कराची कार्यक्षमता अनेक पटींनी वाढवू शकतो.
भविष्यातील रणांगणात सैनिकांची संख्या नव्हे, तर माहितीवरील नियंत्रण, निर्णयाचा वेग आणि लक्ष्यभेदनाची अचूकता निर्णायक ठरणार आहे. नव्या लष्करप्रमुखांना ड्रोन, अचूक शस्त्रे, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती-आधारित निर्णय प्रक्रियेचे लष्करात वेगाने एकीकरण करावे लागेल.
संरक्षण अर्थसंकल्पातील मर्यादा हे आणखी एक गंभीर वास्तव आहे. लष्कर आधुनिकीकरणासाठी उपलब्ध निधी तुलनेने कमी आहे. कार्यान्वयन खर्च, रसद व्यवस्था, कल्याणकारी सुधारणा, माजी सैनिकांचे प्रश्न, वन रँक वन पेन्शन योजना आणि वैद्यकीय सुविधांशी संबंधित आर्थिक जबाबदार्या यांचाही विचार करावा लागतो. या परिस्थितीत उपलब्ध संसाधनांचा जास्तीत जास्त परिणामकारक वापर करणे ही लष्करप्रमुखांसमोरील मोठी कसोटी असेल.
भारतीय संरक्षण व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाच्या बदलांपैकी एक म्हणजे थिएटरायझेशनची संकल्पना. उत्तर, पश्चिम आणि पूर्व या एकात्मिक थिएटर कमांडच्या माध्यमातून लष्कर, नौदल आणि वायुसेना यांच्यात अधिक समन्वय साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रक्रियेत विद्यमान कमांड संरचनेची पुनर्रचना, संसाधनांचे पुनर्वाटप आणि संयुक्त कार्यपद्धती विकसित करावी लागणार आहे.
जनरल धीरज सेठ यांचा अनुभव या संक्रमणासाठी उपयुक्त ठरेल. त्यांनी वाळवंटी भागात आर्मर्ड रेजिमेंटचे नेतृत्व केले असून पश्चिम आघाडीवरील आर्मर्ड ब्रिगेड आणि जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रीय रायफल्स क्षेत्रातही त्यांनी यशस्वी कामगिरी बजावली आहे. सुदर्शन चक्र कोअर, दिल्ली क्षेत्र, दक्षिण-पश्चिम कमांड आणि दक्षिण कमांडमधील त्यांचा अनुभव त्यांना व्यापक दृष्टी प्रदान करतो.
आजचे रणांगण केवळ भूसीमांपुरते मर्यादित राहिलेले नाही. सायबर क्षेत्र, अवकाश, माहिती युद्ध आणि विद्युतचुंबकीय क्षेत्र यांमध्येही संघर्ष सुरू असतो. त्यामुळे सिद्धांत, संघटना, तंत्रज्ञान आणि लष्करी संस्कृती यांची मूलभूत पुनर्कल्पना अपरिहार्य ठरते. 2026 हे वर्ष भारतीय स्थलसेनेने ‘नेटवर्किंग आणि डेटा केंद्रीकरण वर्ष’ म्हणून घोषित केले आहे.
निर्णय प्रक्रियेला वेग देण्यासाठी आणि सर्व स्तरांवर कृतीयोग्य माहिती उपलब्ध करून देण्यासाठी डेटा वर्चस्व हे भविष्यातील युद्धातील प्रमुख शस्त्र ठरणार आहे. याच अनुषंगाने आयडेक्स, आदिती आणि आर्मी डिझाइन ब्युरोसारख्या स्वदेशी उपक्रमांचा प्रभावी वापर करून संरक्षण पुरवठा साखळी अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर बनवावी लागेल.
बहुआघाडीच्या युद्धाची शक्यता, सीमापार दहशतवाद, घुसखोरी, अंतर्गत सुरक्षा आव्हाने आणि नागरी प्रशासनाला द्यावी लागणारी मदत यामुळे लष्करदलावरील ताण वाढत आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाधारित आणि जलद प्रतिसाद देणारी संरचना निर्माण (General Dhiraj Seth) करणे काळाची गरज ठरत आहे. भारतीय लष्करदलाच्या या परिवर्तनाच्या प्रवासात जनरल धीरज सेठ यांना यश लाभावे, हीच अपेक्षा.






