Deepti Sharma Milestone : दीप्ती शर्माचा ऐतिहासिक पराक्रम! आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ‘हा’ खास पराक्रम करणारी ठरली तिसरी भारतीय
Deepti Sharma Milestone : दीप्ती शर्माने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १५० सामने खेळण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला.

Deepti Sharma Plays 150th T20I Match Joins Harmanpreet Kaur Smriti Mandhana Elite Club : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार अष्टपैलू दीप्ती शर्माने (Deepti Sharma) आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. महिला आशिया कप २०२६ (Women’s Asia Cup 2026) स्पर्धेत थायलंडविरुद्ध मैदानात उतरताच तिने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १५० सामने खेळण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला. अशी अद्वितीय कामगिरी करणारी दीप्ती ही भारताची केवळ तिसरी, तर जगातील १२ वी महिला खेळाडू ठरली आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना शफाली वर्माच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर थायलंडला १६० धावांचे लक्ष्य दिले.
हरमनप्रीत आणि स्मृतीच्या पंक्तीत स्थान; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा दबदबा –
भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळण्याचा विक्रम कर्णधार हरमनप्रीत कौर (२०२ सामने) हिच्या नावावर आहे, तर उपकर्णधार स्मृती मानधनाने १७१ सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. आता दीप्ती शर्मा १५० सामन्यांचा टप्पा ओलांडून थेट या दिग्गजांच्या क्लबमध्ये दाखल झाली आहे. थायलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी दीप्तीने १४९ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत १२७० धावा करण्यासोबतच तब्बल १६८ विकेट्स मिळवून अष्टपैलू खेळाडू म्हणून आपले नाणे खणखणीत वाजवले आहे.
मैदानावर ऐतिहासिक विक्रम अन् घरापुढे मर्सिडीज-बेंझ; दीप्तीचा दुहेरी जल्लोष –
From 1st T20I to 1⃣5⃣0⃣th 🙌
From a young debutant to an experienced all-rounder 👌
Deepti Sharma is all set for a special game today 🤗 – By @mihirlee_58#TeamIndia | #WomensAsiaCup | @Deepti_Sharma06 pic.twitter.com/73HWwNQyUr
— BCCI Women (@BCCIWomen) August 30, 2026
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारी दीप्ती शर्मा वैयक्तिक आयुष्यातही चर्चेत आली आहे. या ऐतिहासिक सामन्यापूर्वी तिने आलिशान मर्सिडीज-बेंझ (Mercedes-Benz) कार खरेदी केली. नव्या कारसोबतचे तिचे छायाचित्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून, एकाच वेळी मैदानावरील ऐतिहासिक विक्रम आणि घरापुढे नवी आलिशान गाडी असा दुहेरी आनंद दीप्तीने साजरा केला आहे.
५ सप्टेंबरला भारत-पाक महामुकाबला; १३ सप्टेंबरला होणार महाअंतिम सामना!
आशिया चषकाच्या ग्रुप ‘ए’ मध्ये भारतासह थायलंड, हाँगकाँग आणि पाकिस्तानचा समावेश आहे. भारतीय संघ ३ सप्टेंबरला हाँगकाँगविरुद्ध, तर ५ सप्टेंबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध बहुप्रतीक्षित सामना खेळणार आहे. ग्रुप ‘बी’ मध्ये श्रीलंका, बांगलादेश, यूएई आणि इंडोनेशिया हे संघ आहेत. दोन्ही गटांतील अव्वल दोन संघ १० व ११ सप्टेंबर रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीत पोहोचतील, तर या स्पर्धेचा महाअंतिम सामना १३ सप्टेंबर २०२६ रोजी खेळवला जाईल.





