MPSC online CBT Exam: MPSCच्या ऑनलाईन परीक्षांचा निर्णय २०२७ पर्यंत लांबणीवर; मुख्यमंत्री फडणविसांचे निर्देश
MPSC online CBT Exam: सरकार आणि आयोगाने हा निर्णय पूर्णपणे मागे घ्यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी

MPSC online CBT Exam: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा पद्धतीत संगणकआधारित (CBT) प्रणाली लागू करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची बैठक घेऊन हा निर्णय तूर्तास ऑगस्ट २०२७ पर्यंत पुढे ढकलण्याचा सल्ला ‘एमपीएससी’ला दिला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-अ, गट-ब आणि गट-क पदभरतीच्या पूर्व परीक्षा संगणकआधारित पद्धतीने घेण्याच्या निर्णयाला विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे. देशातील बहुतांश राज्यांच्या नागरी सेवा परीक्षा तसेच केंद्रीय लोकसेवा आयोग यांची परीक्षा अजूनही ऑफलाईन पद्धतीनेच घेतली जाते. मग महाराष्ट्र लोकसेवा आयोगच ‘सीबीटी’ पद्धतीचा आग्रह का धरत आहे, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
विविध विद्यार्थी संघटनांकडून सातत्याने होत असलेल्या मागण्यांची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार, राज्याचे मुख्य सचिव आणि सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सातत्याने विविध विद्यार्थी संघटनांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार तसेच राज्याचे मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत एक बैठक मुंबई येथे घेतली.
यावेळी मुख्यमंत्री… pic.twitter.com/xrrRIE4Zhc
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 16, 2026
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘एक सुरक्षित, पारदर्शी निवड प्रक्रिया हा कायमच माझा आग्रह राहिला आहे. त्यादृष्टीने परीक्षापद्धती सुद्धा पारदर्शीच असली पाहिजे. परीक्षा वेळेत झाल्या पाहिजे आणि त्याचे निकाल सुद्धा वेळेत लागले पाहिजेत. पण, सुधारणांचा हा क्रम हाती घेताना एका व्यवस्थेकडून दुसर्या व्यवस्थेकडे मार्गोत्क्रमण हे तितकेच सुरळीत सुद्धा असले पाहिजे. त्यातून प्रत्येक यंत्रणेला सज्जतेसाठी पुरेसा अवधी सुद्धा मिळावा.
त्यामुळे टप्प्या-टप्प्याने या सुधारणा राबवत संगणकआधारित परीक्षांची प्रक्रिया ही लगेच लागू न करता ऑगस्ट 2027 पासून अंमलात आणावी, जेणेकरुन विद्यार्थ्यांनाही वेळ मिळेल आणि सर्वच यंत्रणांना सज्जता वाढवता येईल आणि तोपर्यंत विद्यमान प्रचलित पद्धतीने परीक्षा घ्याव्यात. त्यानुषंगाने आता पुढील निर्णय एमपीएससीने घ्यावा,’ असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केले. यावेळी त्यांनी एमपीएससीच्या विविध उपक्रमांची प्रशंसाही केली.
दरम्यान, सध्या MPSC च्या सर्व परीक्षा सध्याच्या पारंपरिक पद्धतीनेच घेतल्या जाणार आहेत. भरती प्रक्रिया सुरक्षित, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण व्हावी, तसेच विद्यार्थ्यांना आणि प्रशासनाला नव्या प्रणालीसाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. अंतिम निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेणार असून, या बदलामुळे लाखो MPSC स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्र्यांनी २०२७ पर्यंत ऑनलाईन पद्धत पुढे ढकलण्याचा सल्ला दिला असला, तरी सरकार आणि आयोगाने हा निर्णय पूर्णपणे मागे घ्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.विद्यार्थ्यांच्या मते, संगणकआधारित पद्धतीने परीक्षा घेतल्यास त्यामध्ये तांत्रिक घोळ किंवा गैरप्रकार होण्याची शक्यता अधिक आहे.
हेही वाचा:
Bhool Bhulaiyaa 4: ‘भूल भुलैया 4’ चित्रपटाची अपडेट समोर; कार्तिक आर्यन पुन्हा दिसणार का?





