कोणत्याही कागदपत्राच्या पूर्ततेशिवाय ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कर्जमाफी होणार
सांगली (प्रतिनिधी)- नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असे या योजनेचे नाव असून शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. या योजनेमुळे 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकित असणारी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी सरकारकडून होणार आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील 90 हजार 706 शेतकऱ्यांची 979 कोटी 12 लाख 90 हजार रुपये कर्जमाफी होणार आहे.
भाजप सरकारने केलेल्या शेतकरी सन्मान योजनेपेक्षा सध्याच्या कर्जमाफीमुळे 704 कोटी रुपयांचा अधिक लाभ होणार आहे. महाविकास आघाडी सरकारने केलेल्या दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीमुळे 52 हजार 714 शेतकऱ्यांचे 583 कोटी 35 लाख अल्पमुदत थकीत पीक कर्ज माफ होणार आहे तर मध्यम मुदत कर्ज असलेल्या 22 हजार 776 शेतकऱ्यांचे 247 कोटी 36 लाख रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. तर दीर्घ मुदत कर्ज असलेल्या 15 हजार 315 शेतकऱ्यांचे 148 कोटी 42 लाखाचे थकीत कर्ज माफ होणार आहे.
भाजप सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 1 लाख 19 हजार 753 शेतकऱ्यांना 275 कोटी 10 लाख रुपयांचा लाभ मिळालेला आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारकडून नुकत्याच जाहीर झालेल्या कर्जमाफीमुळे सांगली जिल्ह्याला सातशे चार कोटी रुपये अधिक लाभ झाला आहे. योजनेची अंमलबजावणी मार्च 2020 ला सुरू होईल. शेतकऱ्याला मिळणारी ही कर्जमाफी कोणत्याही अटीशिवाय मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचा ऑनलाईन अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. तसेच वारंवार राष्ट्रीयकृत बॅंकेच्या फेऱ्या मारण्याचीही आवश्यकता नाही. कोणत्याही कागदपत्राच्या पूर्ततेशिवाय ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी होणार आहे. यामुळे सांगली जिल्ह्यातील महापुरामुळे त्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. महापुराच्या काळात शेतीचे झालेले अतोनात नुकसान भरून काढण्यासाठी हा निर्णय शेतकऱ्यांना दिलासादायी ठरेल. कर्जमाफीमुळे सांगली जिल्ह्यासह राज्यातील इतर सर्व शेतकऱ्यांच्या महाविकास आघाडीकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण होतील यात शंका नाही.