Dattatray Bharne – सीमेवर उभा असलेला सैनिक आपल्या सुरक्षित आयुष्याचा खंबीर आधार असतो. सुभेदार सुनील खराडे यांनी २८ वर्षे प्रतिकूल परिस्थितीत देशसेवा करताना जपलेली राष्ट्रनिष्ठा ही प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे. माजी सैनिकांचा सन्मान हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून तो समाजाच्या कृतज्ञतेचा जाहीर उच्चार आहे, असे गौरवोद्गार कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काढले. इंदापूर तालुक्यातील खराडेवस्ती (भरणेवाडी) येथे भारतीय सैन्य दलातील १३० एअर डिफेन्स रेजिमेंटमध्ये तब्बल २८ वर्षे निष्ठा, शौर्य आणि शिस्तीची परंपरा जपत देशसेवा बजावून निवृत्त झालेल्या सुभेदार सुनील खराडे यांच्या सेवापूर्तीनिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते. यावेळी भरणे यांच्या हस्ते सुभेदार खराडे यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला. यावेळी भरणे म्हणाले की, राज्यातील युवकांनी सैन्यदलाकडे करिअरच्या संधीपेक्षा राष्ट्रसेवेच्या ध्येयाने पाहणे गरजेचे आहे. माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून त्यांच्या सन्मानाचे उपक्रम समाजाने व्यापक स्वरूपात राबवावेत. सैनिकांच्या त्यागामुळेच देशातील सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीचा मार्ग सुरक्षित राहतो. सैनिक सक्षम असेल, तर राष्ट्र अधिक समर्थ होते,असे त्यांनी अधोरेखित केले. विविध क्षेत्रातील मान्यवर, माजी सैनिक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाने परिसरात देशभक्तीचा माहोल निर्माण झाला. ग्रामीण युवकांमध्ये सैन्यदलाविषयी आकर्षण वाढवणार्या या सोहळ्यात उपस्थितांनी सुभेदार सुनील खराडे यांना शुभेच्छा दिल्या. तीन दशकांची तेजस्वी सेवा सुभेदार सुनील खराडे यांनी भारतीय सैन्य दलाच्या १३० एअर डिफेन्स रेजिमेंटमध्ये तीन दशके विविध ठिकाणी जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांची कर्तव्यनिष्ठ वृत्ती, शिस्तप्रिय स्वभाव आणि धैर्यशील कामगिरीचा कार्यक्रमात विशेष गौरव करण्यात आला. ग्रामीण भागातून सैन्यात जाऊन त्यांनी उभा केलेला आदर्श उपस्थितांनी अभिमानाने अधोरेखित केला. समारंभात सुभेदार खराडे यांच्या कुटुंबियांचाही सन्मान करण्यात आला. “सैनिक घडवण्यात कुटुंबाचा त्याग मोलाचा असतो,” असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.