Dattatray Bharne: नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा आदर्श घ्या! कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला
Dattatray Bharne: इंदापूर तालुक्यातील काटी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा ७५ वा अमृत महोत्सव संपन्न; १०० टक्के नियमित कर्ज फेडणाऱ्या सभासदांचा विशेष सत्कार.

Dattatray Bharne – नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा. मात्र, कर्ज थकलेल्या शेतकऱ्याला दोष देऊन चालणार नाही. नैसर्गिक संकटे, उत्पादन खर्च, बाजारपेठेतील चढ-उतार अशा अनेक अडचणींमुळे शेतकऱ्याची कर्जफेडीची क्षमता प्रभावित होते. त्याच्या अडचणी समजून घेऊन त्याला पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे ही शासन आणि सहकार व्यवस्थेची सामूहिक जबाबदारी आहे,
असे प्रतिपादन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. काटी (ता. इंदापूर) येथील काटी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात कृषिमंत्री भरणे बोलत होते. संस्थेने स्थापनेपासून नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या १०० टक्के नियमित सभासदांचा विशेष सत्कार करून त्यांच्या आर्थिक शिस्तीचा गौरव केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे होते. कृषिमंत्री भरणे म्हणाले, नीरा-देवधरचे पाणी उपलब्ध आहे; मात्र आपण टेलला आहोत. भविष्यात पाण्याची मागणी वाढणार असून उपलब्धतेवरही मर्यादा येणार आहेत. त्यामुळे पुढील दहा वर्षांचा विचार करून आतापासूनच पाण्याचे नियोजन करावे लागेल. पाण्याचा काटकसरीने वापर, सूक्ष्म सिंचन आणि उपलब्ध जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन याला प्राधान्य द्यावे लागेल.
पाण्याचा प्रश्न हा केवळ शेतीचा प्रश्न नाही. त्याचा थेट संबंध ग्रामीण अर्थव्यवस्था, शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि पुढील पिढीच्या भवितव्याशी आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन ही आजची गरज नसून उद्याच्या विकासाची पूर्वअट आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेती परवडत नाही, हा विचार डोक्यातून काढून टाका. आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने वापर केला तर शेती निश्चितच परवडू शकते.
उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादन वाढविणे आणि उपलब्ध मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर करणे यासाठी कृषी यांत्रिकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञान आवश्यक आहे. खते व बियाण्यांच्या उपलब्धतेसाठी कृषी विभागाने नियोजन केले असून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली जात असल्याचे भरणे यांनी सांगितले.
कार्यक्रमास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पीडीसीसी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, विलास वाघमोडे, सोमेश्वर वाघमोडे, साहेबराव मोहिते, मोहन गुळवे यांच्यासह पंचक्रोशीतील प्रमुख पदाधिकारी, शेतकरी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब सोलनकर, उपाध्यक्ष बाळासाहेब गोरे, सचिव जे. पी. काळे व संचालक मंडळाने केले.






