Dangerous Bridges Closed : ६८ वर्षे जुना पूल आणि मुठा नदीचा धोका! हवेली तालुक्यातील ‘हे’ दोन मोठे पूल वाहतुकीसाठी बंद
Dangerous Bridges Closed : हवेली आणि राजगड तालुक्यातील दोन अत्यंत धोकादायक पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश.

Dangerous Bridges Closed – हवेली तालुक्यातील खडकवासला भागातील कातवडी-कोंढूर-निळकंठेश्वर मार्गावरील मुठा नदीवरील पूल आणि राजगड तालुक्यातील खानापूर ते पानशेत मार्गावरील मोठा पूल हे दोन्ही पूल धोकादायक स्थितीत असल्याने सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत. मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ११५ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
पूल बंद झाल्यामुळे कातवडीकडून डावजे-कुरणकडे जाणारी वाहतूक कातवडी-बहुली-कोंढूर-डावजे-जांभळी-कुरण या मार्गाने वळविण्यात आली आहे. तसेच, कुर-डावजे बाजूकडून कातवडीकडे येणारी वाहतूक कुर-जांभळी-डावजे-कोंढूर-बहुली-कातवडी या पर्यायी मार्गाचा वापर करण्यात यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
खानापूर ते पानशेत मार्गावरील पूल ६८ वर्षांहून अधिक जुना असून, विशेष तांत्रिक परीक्षणात त्याची स्थिती अत्यंत कमकुवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आगामी मान्सून काळात मुठा नदीच्या विसर्गामुळे दुर्घटना व जीवितहानीची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. लवासा, वरसगाव व आसपासच्या भागातून पानशेतकडे जाणारी वाहतूक निळकंठेश्वर रस्ता-डावजे-कोंढूर-बहुली-कातवडी-मांडवी-कुडजे-खडकवासला धरणमार्गे गोऱ्हे-खानापूर या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
तसेच, पानशेत व वरसगाव धरण परिसरातून पुणेकडे येणारी वाहतूक कुरण खुर्द-राणवडी-सोनपूर-ओसाडे-खानापूर-गोऱ्हे-खडकवासला धरणमार्गे-कुडजे-मांडव-कातवडी-बहुली-कोंढूर-डावजे-निळकंठेश्वरमार्गे वळविण्यात येत आहे. नागरिकांनी प्रशासनाने निर्धारित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा व वाहतूक व्यवस्थेस सहकार्य करावे, असे आवाहनही प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी केले आहे.





