Dahiwadi Nagar Panchayat – दहिवडी नगरपंचायतीने ‘माझी वसुंधरा 4.0’ अभियानांतर्गत राज्यात प्रथम क्रमांक, भूमी थिमॅटिक क्षेत्रात राज्यात प्रथम तसेच ‘माझी वसुंधरा 5’ मध्ये राज्यात तृतीय क्रमांक पटकावत एकाच वेळी तीन मानाचे पुरस्कार मिळवले. या यशामुळे दहिवडी नगरपंचायतीला सव्वा सहा कोटी रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले आहे. मुंबई येथे झालेल्या समारंभात राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते नगराध्यक्षा नीलम जाधव, प्रभारी नगराध्यक्षा सुरेखाताई पखाले व मुख्याधिकारी संदीप घार्गे यांनी पुरस्कार स्वीकारले. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली दहिवडी शहराने पर्यावरणपूरक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करत राज्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मुंबईतील पुरस्कार वितरणप्रसंगी भाजप पक्षाचे अतुल जाधव, माजी नगराध्यक्ष सागर पोळ, नगरसेवक सुरेंद्र मोरे, रुपेश मोरे, बाळासाहेब सावंत, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. मुख्याधिकारी संदीप घार्गे म्हणाले, माझी वसुंधरा 4 व 5 अशा दोन्ही अभियानांत तीन पुरस्कार मिळवणारी जिल्ह्यातील दहिवडी नगरपंचायत ही यंदाची एकमेव नगरपंचायत ठरली आहे. नगरसेवक, कर्मचारी व नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे यश आहे. नगराध्यक्षा नीलम जाधव म्हणाल्या, हा सन्मान फक्त नगरपंचायतीचा नसून दहिवडीतील प्रत्येक नागरिकाचा आहे. पर्यावरण संवर्धन आणि विकास या दोन्हींचा समतोल राखत आम्ही पुढेही अशीच प्रगती साधणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ना. जयकुमार गोरे यांच्यामुळे दहिवडीमध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे सर्वत्र सुरू आहेत.